हायलाइट्स:
- झी मराठीवरील अग्गबाई सूनबाई मालिका उत्कंठावर्धक वळणावर
- सोहमच्या प्रेमप्रकरण कळल्यानंतर शुभ्रा नेमके काय करणार?
- शुभ्राच्या आयुष्यात येणारr नवीन व्यक्ती तिला तारणार का मारणार?
अग्ग बाई सुनबाई या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेच्या नवीन पर्वामध्ये आसावरीने सर्व घराची सूत्र हाती घेतली असून सोहम तिचा राईट हॅन्ड झाला आहे. तर अभिजीत राजे यांनी स्वतःहून सर्व घरची जबाबदारी स्वीकारली आहे. शुभ्रा आणि अभिजीत राजे या दोघांमध्ये बाबा आणि मुलीचे नाते आहे.
या मालिकेतील आताचे शुभ्राचे रूप खूप वेगळे आहे. ही शुभ्रा थोडी बुजरी आहे. ती एका मुलाची आई आहे. तिला मुलाची काळजी आहे. मी करते ते बरोबर की नाही हा भाव तिच्या मनात सतत असतो. बबडूची (मुलाची) पूर्ण जबाबदारी असल्याने ती घरातच आहे, ती अतिशय प्रोटेक्टिव्ह आहे, शुभ्रा अशी आहे कारण मुलाच्या म्हणजेच बबडूच्या जन्माच्यावेळेस निर्माण झालेली गुंतागुंत आणि सोहम सोबत संसार टिकवण्यासाठीची तिची सुरू असलेली धडपड. परंतु संसार टिकवण्याची तिची ही धडपड अपयशी ठरते. कारण लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी सोहम आणि सुझेनचे प्रेमप्रकरण शुभ्रा समोर येते. सोहम आपल्याशी प्रतारणा करत असल्याचा मोठा धक्का शुभ्राला बसतो. ती खूप निराश होते आणि त्याच निराशेच्या भरात ती आत्महत्या करण्याचा निर्णय घेते. त्याचवेळेस तिच्यासमोर अनुराग गोखले नावाची व्यक्ती येते, कोण आहे हा अनुराग? तो शुभ्राला या संकटातून बाहेर काढणार का? की तोच तिच्यापुढे काही नवीन संकट घेऊन येणार हे लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे.

या मालिकेतील नवीन एंट्री असलेले पात्र म्हणजे अनुराग गोखले. ही भूमिका चिन्मय उदगीरकर साकारत आहे. या मालिकेच्या निमित्ताने चिन्मयचे पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीवर पुनरागमन होत आहे. याआधी चिन्मय ‘झी मराठी’वरील ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेतून प्रेक्षकांसमोर आला होता. पाहायला विसरू नका ‘अग्गबाई सूनबाई’ सोमवार ते शुक्रवार रात्री ८.३० वा. फक्त आपल्या ‘झी मराठी’वर.