हायलाइट्स:
- मुंबई विमानतळ पूर्णपणे अदानी समूहाच्या ताब्यात
- विमानतळ ताब्यात येताच एएएचएलचे मुख्यालय गुजरातमध्ये हलवले
- मनसेचा अदानी समूहाला थेट इशारा
मनसेचे नेते व माजी आमदार नितीन सरदेसाई (Nitin Sardesai) यांनी या संदर्भात एक ट्वीट केलं आहे. ‘विमानतळाचं फक्त व्यवस्थापन अदानींकडं गेलय. विमानतळ मुंबईमध्येच आहे. आम्हाला डिवचण्यासाठी ‘गरबा’ कराल तर आम्हालाही आमचा ‘झिंगाट’ दाखवावा लागेल…,’ असा इशारा सरदेसाई यांनी दिला आहे.
संकटात असलेल्या जीव्हीकेकडून अदानी समूहानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडचा (मिआल) ताबा स्वत:कडं घेतला आहे. त्याचबरोबर नवी मुंबईतील प्रस्तावित विमानतळाचा ताबाही ‘एएचएल’कडं गेला आहे. विमानतळाची खरेदी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ‘एएएचएल’नं मुंबईत मुख्यालय थाटलं होतं. पण खरेदी प्रक्रिया पूर्ण होताच कंपनीनं आपलं मुख्यालय गुजरातमध्ये अहमदाबादला हलवलं आहे. यामुळं मुंबईतून गुजरातकडं जाणाऱ्या उद्योगात आणखी एक भर पडली आहे. सध्या मुंबईसह देशातील इतर सहा विमानतळांचा ताबा अदानी समूहाकडं आहे.
काँग्रेसचा मोदी सरकारवर आरोप
‘मुंबई विमानतळाचं मुख्यालय मुंबईतून अहमदाबादला हलवणं हा मोदींचा महाराष्ट्राच्या जनतेला संदेश आहे. विमानतळावर झालेलं दांडीया नृत्य बरंच काही सांगून जातं. मुंबईचं महत्त्व कमी करण्यासाठी गेल्या ७ वर्षांत जे प्रयत्न झाले, त्याचा हा एक भाग आहे. जागतिक वित्तीय केंद्रही असंच गुजरातला नेलं गेलं,’ अशी टीका महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
आणखी वाचा:
ओबीसी आरक्षण: मुख्यमंत्र्यांसह पवार व थोरातांवर भाजपचा गंभीर आरोप
संवेदनशील मुख्यमंत्री! उद्धव ठाकरेंमुळे वाचले अपघातग्रस्त तरुणांचे प्राण