अन्न सुरक्षेबाबत एफएसएसएआयचे राज्यांना कडक निर्देश नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

अन्न सुरक्षेबाबत एफएसएसएआयचे राज्यांना कडक निर्देश नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा
- Advertisement -


अन्न सुरक्षेबाबत एफएसएसएआयचे राज्यांना कडक निर्देश नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

नवी दिल्ली, दि. १८ : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना अन्न सुरक्षा नियमांची काटेकोर आणि प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. अन्न हाताळणी, प्रक्रिया आणि पॅकिंग करताना केवळ ‘फूड-ग्रेड‘ (अन्न-दर्जा), विषमुक्त आणि गंजरोधक सुऱ्या, ब्लेड तसेच इतर कापण्याची उपकरणे वापरणे बंधनकारक असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

एफएसएसएआय‘ने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार, काही अन्न व्यवसायांमध्ये गंजलेल्या, तडे गेलेल्या, खराब झालेल्या अथवा रंग लावलेल्या सुऱ्या व कापण्याच्या साधनांचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा उपकरणांमुळे अन्नामध्ये भौतिक, रासायनिक आणि सूक्ष्मजीवजन्य दूषितीकरण  होण्याची शक्यता असून, त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असे प्राधिकरणाने म्हटले आहे.

अन्न तयार करणे, प्रक्रिया करणे, पॅकिंग करणे आणि साठवणूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व उपकरणांचा तसेच अन्नाच्या संपर्कात येणाऱ्या पृष्ठभागांचा दर्जा ‘फूड-ग्रेड’ व गंजरोधक असणे आवश्यक असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, अशा उपकरणांची नियमित स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि योग्य देखभाल करण्यावर भर देण्यात आला आहे. गंज, तडे, रंग निघणे किंवा इतर दोष असलेली उपकरणे तात्काळ बदलण्याच्या सूचनांसह अन्न व्यवसायांनी स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या सर्व मानकांचे काटेकोर पालन करावे, असेही ‘एफएसएसएआय’ने स्पष्ट केले आहे.

या निर्देशांचे उल्लंघन झाल्यास ‘अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम, २००६’ तसेच संबंधित नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्राधिकरणाने दिला आहे. राज्य अन्न सुरक्षा आयुक्त, परवाना प्राधिकरणे आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना तपासणीदरम्यान विशेष दक्षता बाळगण्याचे तसेच नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध आवश्यक ती कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

0000000

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली



Source link

- Advertisement -