Home ताज्या बातम्या अरबी समुद्रावर चक्रीवादळांचे ‘वारे’; अतीतीव्र वादळांमध्ये १५० टक्क्यांची वाढ

अरबी समुद्रावर चक्रीवादळांचे ‘वारे’; अतीतीव्र वादळांमध्ये १५० टक्क्यांची वाढ

0
अरबी समुद्रावर चक्रीवादळांचे ‘वारे’; अतीतीव्र वादळांमध्ये १५० टक्क्यांची वाढ

म. टा. प्रतिनिधी, मुंबई: अरबी समुद्रावर निर्माण होणाऱ्या वादळांचे प्रमाण सन २००१ ते २०१९ या कालावधीमध्ये ५२ टक्क्यांनी वाढल्याचे समोर आले आहे. अतीतीव्र चक्रीवादळांचे प्रमाणही १५० टक्क्यांनी वाढले आहे. पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरोलॉजीच्या (आयआयटीएम) तज्ज्ञांनी नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार अरबी समुद्रावर निर्माण होणाऱ्या चक्री‍वादळांची वारंवारता, कालावधी आणि तीव्रता वाढली आहे. ‘स्प्रिंगर’ या नियतकालिकामध्ये हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.

‘चेंजिंग द स्टेटस ऑफ ट्रॉपिकल सायक्लॉन्स ओव्हर द नॉर्थ इंडियन ओशन’ या शोधनिबंधामध्ये बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावरील उष्णकटीबंधीय चक्रीवादळांचा वेध कालावधी, वारंवारता, वितरण, निर्मितीचे स्थान या मापदंडांच्या आधारे घेण्यात आला आहे. यामध्ये सन १९८२ ते २०१९ या ३८ वर्षांमधील चक्रीवादळांचा आढावा घेण्यात आला आहे. सर्वसाधारणपणे बंगालच्या उपसागरामध्ये अरबी समुद्राच्या तुलनेत अधिक चक्रीवादळांची निर्मिती होते. मात्र २००१ ते २०१९ या कालावधीमध्ये बंगालच्या उपसागरावरील चक्रीवादळांच्या वारंवारतेत आठ टक्के घट झाली आहे.

पूर्वी अरबी समुद्रापेक्षाही बंगालच्या उपसागरावर उष्णकटिबंधीय चक्रीवादळ निर्माण होण्यासाठी समुद्र आणि वातावरणीय स्थिती अनुकूल असे. मात्र, अलीकडे अरबी समुद्रावर चक्रीवादाळासंबंधी विसंगत स्थिती निर्माण होत असल्याचे शास्त्रज्ञांच्या निर्दशनास आले आहे, असे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.

शोधनिबंधाचे लेखक आणि ‘आयआयटीएम’चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रॉक्सी कोल यांनी अरबी समुद्रावर निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांचे प्रमाण वाढण्याचा थेट संबंध समुद्रपृष्ठाचे वाढते तापमान आणि जागतिक तापमानवाढीमुळे वाढलेले आर्द्रतेचे प्रमाण यांच्याशी असल्याचे स्पष्ट केले. यामुळे चक्रीवादळांची केवळ संख्या वाढत आहे असे नाही, तर आकृतिबंध आणि स्वरूपही बदलत आहे. चक्री‍वादळांच्या तीव्रतेसह त्यांचा एकूण कालावधीही वाढला आहे, असेही ते म्हणाले. गेल्या दोन दशकांपासून अरबी समुद्रावरील चक्री‍वादळांच्या एकूण कालावधीत ८० टक्क्यांनी वाढ झाली आहे; तसेच अतितीव्र चक्री‍वादळांच्या कालावधीत २६० टक्क्यांनी वाढ झाली आहे; तसेच तीव्रता मान्सूनच्या पावसानंतर २० टक्के, तर मान्सूनच्या आधी ४० टक्के वाढली आहे.

संख्या आणि तीव्रता

– सन १९८२ ते २००० या काळात ९२ उष्णकटिबंधीय चक्रीवादळे निर्माण झाली. त्यापैकी ३० टक्के अतितीव्र होती.

– २००१ ते २०१९ या काळात चक्री‍वादळांची संख्या १००पर्यंत पोहोचली. त्यापैकी ३६ टक्के चक्री‍वादळे अतितीव्र आहेत.

मागील काही वर्षांतील वादळे

– २०१५ मध्ये ‘चपळ’ आणि ‘मेघ’ ही अतितीव्र चक्री‍वादळे एकाच महिन्यात लागोपाठ आली होती.

– २०१८ मध्ये आलेल्या ७ पैकी ३ चक्रीवादळे अरबी समुद्रावर निर्माण झाली होती.

– २०१९ मध्ये निर्माण झालेल्या सर्वाधिक ८ पैकी ५ चक्रीवादळे अरबी समुद्रात निर्माण झाली होती.

– २०२० मध्ये आलेल्या ‘निसर्ग’ चक्री‍वादळामुळे इतिहासात प्रथमच महाराष्ट्राच्या किनारी भागात मुंबईजवळ जमीन खचल्याची घटना घडली.

– २०२१ मधील ‘तौक्ते’ चक्रीवादळ आतापर्यंतचे सर्वाधिक तीव्र वादळ असून याचा परिणाम देशाच्या पश्चिम किनाऱ्यावरील चार राज्यांमध्ये जाणवला.

Source link