हायलाइट्स:
- अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या पालकांना अजूनही न्यायाची प्रतीक्षा
- पाच वर्षे लेकीला न्याय मिळवण्यासाठी झिजवत आहेत न्यायालयाचे उंबरठे
- कोर्टकचेरीमध्ये पैसा अडका संपला, तरी न्यायाची अजूनही प्रतिक्षाच
अभिनयाच्या क्षेत्रात काम करण्यासाठी म्हणून प्रत्युषा जमशेदपूरहून मुंबईला आली होती. लहान मोठ्या मालिकांमध्ये काम करत असताना तिला ‘बालिका वधू’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या मालिकेतील आनंदी या भूमिकेमुळे तिला घराघरात लोकप्रियता मिळाली होती. लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच प्रत्युषाने १ एप्रिल २०१६ साली तिने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या करत जीवन संपवले. पोलिसांनी या प्रकरणी तपास करत तिने आत्महत्या केल्याची नोंद केली. परंतु प्रत्युषाने आत्महत्या नाही तर तिची हत्या झाल्याचा संशय तिच्या आई वडिलांनी म्हटले होते. तशी त्यांनी कोर्टात केसही दाखल केली असून ती केस अजूनही कोर्टात सुरू आहे.
प्रत्युषा ही शंकर बॅनर्जी आणि सोमा बॅनर्जी यांची एकुलती एक मुलगी होती. अतिशय लाडात वाढलेल्या प्रत्युषाच्या जाण्याने आई वडिलांना मोठा धक्का बसला. ते त्यातून सावरलेले नाहीत. त्यांनी सांगितले की, ‘आता बोलण्यासाठी काहीच उरलेले नाही. ज्या दिवशी आमची मुलगी गेली त्याच दिवशी आमचे सगळे काही संपले. या घटनेनंतर असे वाटते की एखादे वादळ आले आणि आमचे सगळे आयुष्य त्याने उद्ध्वस्त करून टाकले. केस लढता लढता आमचे सगळे काही संपले. आमच्याकडे एक रुपयाही राहिला नाही. आता आमच्यावर कर्ज घेण्याचीही वेळ आली आहे.’
मुलीच्या आठवणीत तिच्या वडिलांनी सांगितले, ‘ प्रत्युषाशिवाय आमचे कोणीच नाही. तिनेच आम्हाला मोठ्या उंचीवर पोहोचवले होते तिच्या पश्चात आम्ही कसेबसे आयुष्य जगत आहोत. कोर्ट कचेरीसाठी आम्ही राहते घर विकले आणि आम्ही दोघेजण आता एका खोलीत रहात आहोत. आयुष्य कसेबसे जगत आहोत.’
मुलीच्या निधनाचे मोठे दुःख सोसूनही आम्ही अजूनही हिंमत सोडलेली नाही, असे बॅनर्जी दांपत्याने सांगितले आहे. प्रत्युषाच्या वडिलांनी सांगितले, ‘पैशांची अडचण आहे हे अगदी खरे आहे. परंतु अजूनही आम्ही हिंमत हरलेली नाही. एक बाप कधीच हरत नाही. मी माझ्या मुलीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढेन. आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. एक ना एक दिवस आम्हाला न्याय नक्की मिळेल’, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे. बॅनर्जी यांनी पुढे सांगितले की प्रत्युषाची आई चाईल्ड केअर सेंटरमध्ये काम करते. तर ते स्वतः लिखाण करतात. त्यातून काही पैसे जमवले जातात. प्रत्युषाला न्याय मिळवून देणे हेच आमच्या आयुष्याचे अंतीम ध्येय्य आहे आणि मला विश्वास आहे की आम्ही एक दिवस नक्की यशस्वी होऊ.’

























WhatsApp