Home शहरे जळगाव आश्रम शाळांमधील दोन हजार विद्यार्थ्यांना सिकलसेल

आश्रम शाळांमधील दोन हजार विद्यार्थ्यांना सिकलसेल

0

जळगाव : जिल्ह्यातील आश्रमशाळांमधील नऊ हजारांवर विद्यार्थ्यांची रक्ततपासणी करण्यात आली. यात जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांना सिकलसेल आजार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे़ आणखी एका तपासणीनंतर नेमका आकडा समोर येईल, असा दावा आरोग्य विभागाने केला आहे.
महिनाभरापूर्वी लालमाती ता़ रावेर आश्रमशाळेत दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा हादरली होती़
जिल्हाधिकारी डॉ़ अविनाश ढाकणे व जि़ प़ सीईओ डॉ़ बी़ एऩ पाटील यांनी तातडीने आरोग्य विभागाच्या बैठका घेऊन तपासणीचे आदेश दिले होते़ त्यानुसार आरोग्य विभागाने त्रयस्थ संस्थेकडून रावेर, यावल तालुक्यातील तसेच सर्व शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे रक्तनमुने घेण्यात आले.
२७ जानेवारी ते १० फेबु्रवारी या दरम्यान ही मोहिम राबविण्यात आली. सोमवारी हा अहवाल प्राप्त आरोग्य विभागाला प्राप्त झाला़
काय आहे सिकलसेल?
हा आजार अनुवंशिक आहे. यात मुलांमधील तांबड्या पेशींचे जीवनमान कमी असते शिवाय त्यांचा आकार कोयत्यासारखा होतो व त्या एकमेकांना चिकटतात यामुळे एखाद्या अवयवाला आॅक्सीजन तसेच सुरळीत रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे तो अवयव निकामी होतो, तसेच या रूग्णांचे जीवनमान कमी होते़ या आजाराची मुले लवकर थकतात, खेळत नाहीत़ यात सफरर व कॅरीयर असे दोन प्रकार असतात़
जिल्हाभरातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची रक्ततपासणी करण्यात आली. यातील संशयित मुलांचे रक्तनमुने पुन्हा एकदा घेऊन तपासणी करण्यात येणार आहे़ यात हा आकडा कमी होण्याची शक्यता आहे़ त्यांच्या आहार व स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे़
-दिलीप पोटोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जळगाव.