Home शहरे उस्मानाबाद उस्मानाबाद बाजार समिती सात ते सात सुरू राहणार

उस्मानाबाद बाजार समिती सात ते सात सुरू राहणार

उस्मानाबाद । जिल्हा प्रतिनिधी । ६ मे : जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा दीपा मुधोळ मुंडे यांनी लॉकडाऊनच्या कालावधीत उस्मानाबाद जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व आस्थापना सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत चालू ठेवण्याचे आदेश दिले आहेत .

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांमार्फत शेतकऱ्यांच्या शेतमालाची खरेदी तसेच जीवनावश्यक वस्तूंची लिलावाद्वारे विक्री होते. यासाठी नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंचा सुरक्षित पुरवठा व्हावा, या उद्देशाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आस्थापना चालू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचा कालावधी १७ मे पर्यंत वाढविला आहे. या कालावधीत करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. जिल्हयामध्ये विविध आस्थापना त्यांना निश्चित केलेल्या दिवशी ठरवून दिलेल्या वेळेवर चालू ठेवण्यास परवानगीही आहे.