औरंगाबादच्या दौऱ्यावर आलेल्या उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिला ‘हा’ शब्द

- Advertisement -

औरंगाबाद : मान्सूनोत्तर पावसाने राज्यात ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी धीर सोडू नये, शिवसेना त्यांच्या पाठिशी ठामपणे उभी आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, “आम्ही सत्तेत आल्यानंतर सर्वात आधी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार. पावसाचे दृष्टचक्र आपल्या मागे लागले आहे. शेतकऱ्यांने खचून जाण्याचे काही कारण नाही, मी प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळून देणार. शेतकऱ्यांनी आत्महत्येचा विचारही मनात आणू नये. माझा शेतकरी मर्द आहे. तो संकटावर मात करेल. राज्याचा अन्नदाता संकटात आहे. 10 हजार कोटी पुनर्वसनासाठी पुरेसे नाहीत, आम्ही ते वाढवून देऊत.” तसेच शेतकऱ्यांना मदत करताना कागदपत्रांचा घोळ घालू नका, असा सज्जड दमही उद्धव ठाकरेंनी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना यावेळी दिला.

शेतकऱ्यांनी दिले वचन..

आपले सरकार आल्यास सातबारा कोरा करेन, हे माझे शेतकऱ्यांना वचन आहे. दहा हजार कोटी कमी आहेत, ते वाढवले जातील. मत देताना तुम्ही आधार कार्ड किंवा कागदपत्रे विचारली नाहीत. मग आम्ही पण तुम्हाला कागदपत्रे विचारणार नाही. सर्व अडथळे बाजूला सारुन शेतकऱ्यांना मदत देऊ. मी नेता म्हणून नाही, तर कुटुंब प्रमुख म्हणून आलो आहे. कारण भलेभले नेते मोठे झाल्यावर विसरुन जातात. पण मी तुम्हाला धीर द्यायला आलो आहे, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना नोटिसा बजावत असाल तर त्या जाळूच पण तुम्हालासुद्धा वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही. कर्जवसुलीसाठी नोटीसा बजावणाऱ्या बँकांना उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला आहे.

- Advertisement -