कचऱ्यापासून रोजगार आणि उद्योग उभारणीसाठी अमृत-सक्षम उपक्रम

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली नसरापूर घटनेतील पीडित कुटुंबीयांची भेट – महासंवाद
- Advertisement -


  • ‘अमृत’ आणि ‘आर्टी’चा विशेष उद्योजकता विकास उपक्रम
  • संयुक्त उपक्रमातून महाराष्ट्रात हरित उद्योजकतेला चालना

मुंबई, दि. १५ : कचऱ्यापासून रोजगार आणि उद्योग निर्मितीच्या माध्यमातून एकाच वेळी परिसर स्वच्छ करणे आणि हाताला शाश्वत काम देणे हे हेतू साध्य करण्यासाठी “अमृत-सक्षम” हा विशेष उद्योजकता विकास उपक्रम ‘अमृत’ आणि ‘आर्टी’ या संस्था एकत्रितपणे राबविणार आहेत.

महाराष्ट्रात आता कचरा व्यवस्थापन हे केवळ स्वच्छतेचे किंवा पालिकेचे काम राहिलेले नाही, तर ते वेगाने वाढणारे एक सक्षम ‘हरित उद्योग’ क्षेत्र बनले आहे. वाढते शहरीकरण आणि पर्यावरण रक्षणाचे कडक नियम यामुळे या क्षेत्रात व्यवसायाच्या अभूतपूर्व संधी निर्माण झाल्या आहेत. राज्यातील तरुण, महिला आणि नवोदित व्यावसायिकांना उद्योग जगतात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी ‘अमृत’ (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) आणि ‘आर्टी’ (अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था) या दोन शासकीय संस्थांनी पुढाकार घेतला आहे. दोन शासकीय संस्थांचे हे लोकोपयोगी आणि पर्यावरणपूरक अभियान म्हणजे ‘विकसित भारत-2047’ या संकल्पनेची महाराष्ट्रातील खरी नांदी आहे. हा लोककल्याणकारी प्रकल्प यशस्वी करण्यासाठी ‘आर्टी’चे महासंचालक सुनिल वारे आणि ‘अमृत’चे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी संकल्प केला आहे.

‘आर्टी’च्या पाठीशी असलेला मोठा सामाजिक लाभार्थी समूह आणि ‘अमृत’ संस्थेकडे असलेले दर्जेदार प्रशिक्षण व कौशल्य विकासाचे जाळे एकत्र आल्यामुळे हा उपक्रम सर्वसामान्यांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरणार आहे.

कचऱ्यापासून नियमित उत्पन्न व शाश्वत व्यवसायाचे धडे

या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत रोजच्या कचऱ्यापासून नियमित उत्पन्न आणि शाश्वत व्यवसाय कसा उभा करावा, याचे परिपूर्ण धडे दिले जाणार आहेत. यामध्ये सुकलेल्या फुलांपासून अगरबत्ती आणि धूप बनवणे, प्लास्टिक, कागद व काच यांचे रिसायकलिंग करणे तसेच ‘रिसोर्स रिकव्हरी सेंटर’ सुरू करणे अशा विविध नाविन्यपूर्ण संकल्पनांचा समावेश आहे. “अमृत-सक्षम” हा केवळ एक पुस्तकी प्रशिक्षणाचा भाग नसून संकल्पनेपासून ते प्रत्यक्ष उद्योग उभारणीपर्यंतचा एक परिपूर्ण प्रवास आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांना योग्य व्यवसायाची निवड करणे, आर्थिक नियोजन व बँक कर्ज प्रक्रिया समजून घेणे, शासकीय योजना व अनुदानाचा प्रत्यक्ष लाभ मिळवणे आणि तयार उत्पादनाची विक्री करण्यासाठी हक्काची बाजारपेठ मिळवणे अशा सर्वच पातळ्यांवर टप्प्याटप्प्याने मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे.

विशेष म्हणजे या हरित क्रांतीचा भाग होण्यासाठी या क्षेत्रातील कोणत्याही पूर्वानुभवाची गरज नाही. स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणारे तरुण-तरुणी, महिला बचत गट, विद्यमान व्यवसायाचा विस्तार करू इच्छिणारे व्यावसायिक, निवृत्त अधिकारी-कर्मचारी, सामाजिक संस्था आणि पर्यावरणप्रेमी नागरिक या उपक्रमात सहभागी होऊ शकतात. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना तज्ज्ञ मार्गदर्शकांचे थेट पाठबळ, उद्योग उभारणीसाठी ‘अमृत’च्या विविध योजनांतर्गत विशेष मदत आणि बाजारपेठेतील मोठ्या खरेदीदारांशी थेट नेटवर्किंग करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल. दोन्ही संस्थांच्या लक्षित गटातील इच्छुक उमेदवारांनी संबंधित संस्थेच्या कार्यालयात नोंदणी पूर्ण झाल्यानंतर ‘अमृत-सक्षम’ची चमू अर्जदारांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांना त्यांच्या जिल्ह्यातील कार्यशाळेची तारीख, वेळ आणि पुढील प्रक्रियेची सविस्तर माहिती देईल.

अधिक माहितीसाठी नागरिकांनी आपल्या जिल्ह्यातील अमृत संस्थेच्या जिल्हा व्यवस्थापकांच्या कार्यालयाला भेट द्यावी.

16 जुलै 2026 रोजी सायं.4.00 वाजता ‘अमृत’ या यूट्यूब चॅनल वरून एका विशेष सत्राचे थेट प्रक्षेपणही प्रसारित केले जाणार आहे. या सत्रामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे,असे आवाहन आर्टीचे महासंचालक सुनिल वारे आणि ‘अमृत’चे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे.

0000

शैलजा पाटील/विसंअ

 

 



Source link

- Advertisement -