हृदविकार, मधुमेह आणि किडनी आजार
अपुरे मनुष्यबळ आणि वाढणारी लोकसंख्या यामुळे मुंबई पोलिसांवर आधीच कामाचा ताण असताना करोना विषाणूने हा ताण आणखी वाढविला. पोलिस यंत्रणेवर येणारा ताणही मृत्यूस कारणीभूत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. करोनाचे कारण सोडले तर सर्वाधिक पोलिसांचा मृत्यू हृदविकार, मधुमेह आणि किडनी आजाराने झाला आहे. अचानक छातीत दुखू लागणे, चक्कर येणे आणि उपचारासाठी दाखल करण्यापूर्वी मृत्यू होण्याचे प्रकारही पोलिसांच्या बाबतीत घडले आहेत.
मनुष्यबळाची कमतरता
कधीही न झोपणारे शहर म्हणून मुंबईची ओळख आहे. मुंबईची लोकसंख्या, लोकांची लाइफस्टाइल, गुन्हे यामुळे इतर शहरांच्या तुलनेत मुंबईत मनुष्यबळ अधिक लागते. पोलिस शिपाई ते सहायक पोलिस उपनिरीक्षक यासाठी मंजूर पदसंख्या ४० हजार ४७० इतकी आहे. मात्र, प्रत्यक्षात मुंबई पोलिस दलात ६,७३७ कमी म्हणजेच ३३,७३३ पोलिस कार्यरत आहेत. पोलिस उपनिरीक्षक ते पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची मंजूर पदे ५,५९० असून सध्या मुंबई पोलिस दलात ३,८८४ अधिकारी कार्यरत आहेत. १,७०६ अधिकाऱ्यांची मुंबई पोलिस दलात कमतरता आहे. फेब्रुवारी २०२१ पर्यंतच्या आकडेवारीनुसार ही माहिती आहे.