Home शहरे अहमदनगर केडगाव हत्याकांडात सीआयडीने एकही आरोपी अटक केला नाही

केडगाव हत्याकांडात सीआयडीने एकही आरोपी अटक केला नाही

अहमदनगर :  ‘केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात तपासामध्ये दिरंगाई होत असून सदर घटनेचा तपास हा सीबीआय किंवा स्पेशल अन्वेषण पथक यांच्याकडे द्यावा व इतर आरोपींना त्वरित अटक करावी अशी मागणी आज अनिता ठुबे व सुनीता कोतकर यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, खासदार सदाशिव लोखंडे, उप जिल्हाप्रमुख गिरीश जाधव नगरसेवक योगीराज गाडे, संग्राम कोतकर, प्रमोद दुबे, मदन आढाव आदी यावेळी उपस्थित होते.

निवेदनामध्ये म्हटले आहे, की शिवसेनेच्या दोन पदाधिकारी संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या झाली त्याचा तपास अतिशय संथ गतीने सुरू असून त्यातील फरार आरोपींना अद्याप पर्यंत अटक झालेली नाही. या गुन्ह्याचा तपास गेली एक वर्षापासून सीआयडी पुणे करीत असून त्यांनी आजपर्यंत एकाही फरार आरोपीला अटक केलेला नाही. या गुन्ह्यात मुख्य आरोपी आमदार शिवाजी कर्डिले यांची मुलगी सुवर्णा कोतकर ही असून येथील आमदार कर्डिले यांच्या घरी राहत असून तिला अद्याप पर्यंत अटक केली नाही तसेच दर शनिवारी दर्शनाला शनिशिंगणापूर येथे दर्शनाला जात असते या संदर्भामध्ये सीआयडी यांना लेखी व तोंडी माहिती देऊनही त्याचा काहीच उपयोग झाला नाही त्यांनी त्यांना अटकही केली नाही.

त्याचप्रमाणे देवस्थानचे सीसीटीव्ही फुटेज तपास अधिकाऱ्यांनी तपासून पाहिले नाहीत ते तपासले असते तर आरोपी सापडले असते याचा अर्थ तपासी अधिकारी जाणीवपूर्वक फरार आरोपींना अटक करत नसून त्यांना मदत करतात, मुख्य फरारी आरोपी अटक झाल्यास या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार कोण आहे हे तपासातून उघड होईल म्हणून या गुन्ह्याचा तपास सीआयडी, पुणे यांच्याकडून काढून तो सीबीआय किंवा स्पेशल अन्वेषण पथक यांच्याकडे देण्यात यावा तसेच सदर खून खटला हा न्यायालय सरकारची बाजू मांडण्यासाठी व आरोपींना शिक्षा होण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम किंवा त्या दर्जाचा अभिव्यक्तीची नियुक्ती करावी अशी मागणी सुद्धा या निवेदनाद्वारे केली आहे.