Home बातम्या कोट्यावधीच्या रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्या टोळीस अटक

कोट्यावधीच्या रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्या टोळीस अटक

0

मुंबई : कोट्यावधीच्या रक्तचंदनची तस्करी करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या कक्ष क्रमांक ९ च्या पोलिसांनी पर्दाफाश केला होता. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोहम्मद अली मोहम्मदीन (३२) याला चेन्नईमधून आणि दिलीप कुमार जैन उर्फ मनोज (५६) याला नवी मुंबईतून अटक केली आहे. सांताक्रूझ परिसरात एक टोळी रक्तचंदनाची तस्करी करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सांताक्रूझ येथे दोन टेम्पोवर कारवाई करत असगर इस्माईल शेख (४९) अली शेख (३२) व वाजिद अब्बा अन्सारी (३२) यांच्यासह एक हजार ५५६ किलोचे रक्त चंदन हस्तगत केले. हे रक्तचंदन आंध्र प्रदेशच्या जंगलातून चेन्नईला आणि चेन्नईमार्गे मुंबई व इतर ठिकाणी पाठवले जायचे.

या प्रकरणात पोलिसांनी तीन जणांना या पूर्वीच अटक केली होती. मात्र गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार हे चेन्नईत असल्याचे कळाले. त्यानुसार पोलिसांनी मोहम्मद अलीला चेन्नई व दिलीपला नवी मुंबई परिसरातून अटक केली. यातील दिलीप याच्यावर या पूर्वीही रक्तचंदन तस्करी प्रकरणी गुन्ह्यांची नोंद आहे. या तस्करीमागे नक्षली व्यक्तीचा हात असल्याचा संशय पोलिसांना असून त्या अनुषंगाने पोलिस तपास करत आहेत.