मुंबई : महाराष्ट्रातील गड किल्ल्यांवर दारू पिऊन धिंगाणा घालण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी महाविकासआघाडी सरकारने कडक पाऊल उचलले आहे. गड किल्ल्यावर जर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांना आता थेट तुरुंगात पाठवले जाणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गड किल्ल्यांवर गैरवर्तन रोखण्यासाठी नवीन नियमाची घोषणा केली.
गड किल्ल्यावर दारू पिऊन राडा घालणाऱ्यांची संख्या वाढताना दिसतेय. अनेक तरुण गड किल्ल्यांवर जाऊन पार्ट्या करताना दिसतात. आता अशा धिंगाणा घालणाऱ्यांना यापुढे सहा महिने सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. जर एक व्यक्ती दुसऱ्यांदाही पुन्हा आढळून आली. तर त्या व्यक्तीला 1 वर्षाच्या कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.
गृहमंत्रलयाने याविषयी आदेश जारी केला. या आदेशामध्ये राज्यात सार्वजनिक दारूबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे. गड किल्ल्यावर गैरवर्तन करणाऱ्यांना ही शिक्षा लागू केली जाणार आहे. ज्या ठिकाणी मद्य प्राशन करण्यास परवानगी देण्यात आली आहे. अशी जागा वगळता इतर सार्वजनिक ठिकाणी दारुच्या नशेत गैरवर्तन केले तर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, 1949 (सन 1949 चा 25) मधील कलम 85 अन्वये शिक्षेबाबतच्या तरतूद करण्यात आली आहे.