Home ताज्या बातम्या गुणग्राहक संपादक, सर्जनशील साहित्यिक गमावला

गुणग्राहक संपादक, सर्जनशील साहित्यिक गमावला

मुंबई, दि. ११:- परखड पत्रकार, सर्जनशील साहित्यिक म्हणून वामनराव तेलंग महाराष्ट्राच्या मनात कायम राहतील. एक गुणग्राहक संपादक, सर्जनशील साहित्यिक गमावल्याची भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वामनराव तेलंग यांच्या निधनाबद्दल व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री शोक संदेशात म्हणतात, तेलंग यांनी दैनिक तरूण भारतचे संपादक, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, विदर्भ साहित्य संघ येथे काम करताना आपला असा ठसा उमटविला. विदर्भात साहित्य तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रात येणाऱ्या तरूणांना तेलंग यांनी जाणीव पूर्वक प्रोत्साहन दिले. या त्यांच्या गुणग्राहकतेमुळे महाराष्ट्राला चांगले लेखक, पत्रकार मिळाले.

विदर्भातील पत्रकारितेत साहित्यिक अभिरूची रुजविण्याचे श्रेयही तेलंग यांना जाते.

परखड आणि प्रांजळ लेखन शैली हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य प्रत्यक्ष व्यक्तिमत्वातही होते. त्यांच्या जाण्याने गुणग्राहक संपादक, सर्जनशील साहित्यिक गमावला आहे. तेलंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली.