मुंबई, दि. ९ : गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रलंबित प्रश्नांचे न्याय्य आणि तातडीने निराकरण करण्यासाठी शासन कटिबद्ध असून, संबंधित विभागांनी संवेदनशीलतेने कार्यवाही करावी, असे निर्देश मदत व पुनर्वसन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिले. उमरेडचे आमदार संजय मेश्राम यांच्या मतदारसंघातील गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्या आणि प्रमुख मागण्यांबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत राज्यमंत्री जयस्वाल बोलत होते. यावेळी संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी राज्यमंत्री जयस्वाल म्हणाले, वडिलांच्या नावावरील प्रकल्पग्रस्त दाखले कोणतीही अट न घालता हस्तांतरित करण्यात यावेत, गोसीखुर्द येथे धार्मिक पर्यटन आणि जल पर्यटन सुरू करण्यात आले आहे त्यामध्ये प्रकल्प बाधितांना प्राधान्याने रोजगार देण्यात यावा.तसेच प्रकल्प बाधितांना विविध शासकीय योजनांचा लाभ देताना प्राधान्याने देण्यात यावे.
स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत मदत व पुनर्वसन अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन स्थानिक विषय स्थानिक पातळीवर सोडवावेत. गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन प्रक्रियेला गती देऊन त्यांच्या न्याय्य मागण्यांचे निराकरण करण्यासाठी शासन सकारात्मक भूमिका घेईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
0000
दत्तात्रय कोकरे/विसंअ













