हायलाइट्स:
- जयंत पाटील यांनी घेतला मोठा निर्णय
- संपूर्ण सांगली जिल्ह्यात आता कडक लॉकडाऊन
- ५ मेपासून लॉकडाऊनच्या निर्णयाची होणार अंमलबजावणी
सांगली : महाराष्ट्रात कडक निर्बंध लादण्यात आले असले तरीही रस्त्यांवरील गर्दी अजूनही पूर्णपणे कमी झालेली नाही. त्यामुळे अद्याप रुग्णवाढीला अपेक्षित ब्रेक लागलेला नाही. या पार्श्वभूमीवर आता स्थानिक पातळीवर कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला जात असून सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनीही जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची (Lockdown in Sangali) घोषणा केली आहे.
बुधवार दि. ५ मे रोजी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात ८ दिवसांचा कडक लॉकडाऊन लावला जाईल, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
‘काल सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १५६८ वर पोहोचली तर ४० रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला, ही बाब अतिशय गंभीर आहे. परिस्थिती आटोक्यात आणायची असेल, तर लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे प्रशासनाशी चर्चा करून सांगली जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय आम्ही घेत आहोत,’ अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.
का घेण्यात आला संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय?
सांगली जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेताना जयंत पाटील यांनी यामागील कारणांचा उल्लेख केला आहे. ‘आपल्याला ऑक्सिजन काठावर मिळतंय, प्रचंड ताकद खर्च करून बाहेरून ऑक्सिजन मिळवावे लागत आहे. औषधांबाबतही प्रश्न निर्माण होत आहेत, म्हणून ही शृंखला मोडण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे,’ असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
‘जीवनावश्यक वस्तूंपेक्षा आपल्या सर्वांचे जीवन महत्त्वाचे आहे, त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना हा लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती करतो. तुम्हा सगळ्यांच्या मदतीनेच आपल्याला कोरोनावर मात करायची आहे. घरीच रहा, सुरक्षित रहा,’ असं आवाहनही जयंत पाटील यांनी यावेळी केलं आहे.