
मुंबई दि. ९ :- नागरिकांमध्ये जलसाक्षरता वाढवणे, पाण्याच्या बचतीचे महत्व पटवून देणे आणि जलव्यवस्थापनाच्या शाश्वत उपाययोजना राबवणे यासाठी जलसंपदा विभागाच्यावतीने १५ ते ३० एप्रिल २०२५ या कालावधीत ‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा‘ साजरा केला जाणार आहे.
जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याच्या माध्यमातून समाजात पाण्याच्या सुयोग्य वापराबाबत जनजागृती वाढवण्याचा उद्देश आहे. विशेष मोहीम स्वरूपात राबविण्यात येणाऱ्या या लोकाभिमुख उपक्रमात सर्व यंत्रणा व घटकांनी सक्रिय सहभाग घ्यावा,असे आवाहन जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यातील उपक्रम
दिनांक १५ एप्रिल २०२५ रोजी जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२५ साजरा करणे व जलसंपदा पंधरवडा शुभारंभ, १६ एप्रिल रोजी जलसंपदा अधिकारी/कर्मचारी यांचे प्रशिक्षण व ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करणे, १७ एप्रिल रोजी स्वछ व सुंदर माझे कार्यालय, जल पुनर्भरण, १८ एप्रिल रोजी शेतकरी/पाणी वापर संस्था संवाद, १९ एप्रिल रोजी भूसंपादन व पुनर्वसन इ. अडचणी निराकरण, कालवा संयुक्त पाहणी, २० एप्रिल रोजी कालवा स्वच्छता अभियान, २१ एप्रिल रोजी उपसा सिंचनाचे पाणी परवानगी देण्यासाठी तक्रारींची निरसन करणे, २२ एप्रिल रोजी अनधिकृतपणे वाणिज्य व औद्योगिक पाणी उपसा प्रकरणे शोध घेऊन कार्यवाही करणे , २३ एप्रिल रोजी जलसंपदा व कृषी विभागामार्फत संयुक्तपणे पीक पद्धतीबदल, उत्पादकता वाढ, पाण्याचे नियोजन इ. बाबत बैठक/कार्यशाळा मार्गदर्शन कार्यक्रम, २४ एप्रिल रोजी सिंचन ई-प्रणाली, पाणी दर, पाणीपट्टी आकारणी व वसुली, थकीत पाणीपट्टी प्रकरणांचा आढावा, २५ एप्रिल रोजी विद्यापीठ/केव्हीके/ सेवाभावी संस्था यांचे समवेत संवाद व कृती कार्यक्रम, २६ एप्रिल रोजी महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत यांच्या प्रत्यक्ष पाणी वापराचा जललेखा परीक्षण व पाण्याचा पुनर्वापर न करता धरणांमध्ये व नदीमध्ये सांडपाणी सोडण्यात येत असल्याबद्दल प्रकरणांचा शोध घेणे, २७ एप्रिल रोजी आपत्ती व्यवस्थापन करण्यात मार्गदर्शन (पूर/मालमत्तेचे रक्षण), २८ एप्रिल रोजी महसूल विभागाच्या समन्वयाद्वारे महामंडळाचे नावे संपादित जमिनींच्या ७/१२ उताऱ्यावर नोंदी घेणे/अतिक्रमण निष्कासन दिनांक ३१ मे पूर्वी करणे, २९ एप्रिल रोजी पाणी वापर संस्था सक्षमीकरण चर्चासत्र/कार्यशाळा आणि ३० एप्रिल २०२५ रोजी मा. पालकमंत्री यांच्या उपस्थितीत जिल्हा मुख्यालयी कार्यशाळा/महिला मेळावा आणि या पंधरवडा कालावधीत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या अभियंतांचा सत्कार व पंधरवडा समारोप असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत,असे जलसंपदा विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
००००
एकनाथ पोवार/विसंअ/