हायलाइट्स:
- प्रवीण दरेकरांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल
- बंगालमधील हिंसाचारावरून केली टीका
- भाजप राज्यभरात करणारे निदर्शने
‘विचारांची लढाई विचारांनी लढली जावी, तिथे हिंसाचारास थारा नसावा! निवडणुकीनंतर बंगालमध्ये सुरू असलेला हिंसाचार अतिशय निंदनीय असून, हे थांबले पाहिजे, बंगालमध्ये वाघीण जिंकली म्हणणारे, हिंसाचाराच्या घटनेवर मूग गिळून गप्प आहेत. अशा घटनांचे समर्थन होऊ शकते का?’ असा सवाल ट्विटरच्या माध्यमातून प्रवीण दरेकर यांनी विचारला आहे.
‘बंगालमध्ये भाजपकडे गमावण्यासारखं काहीही नव्हतं. आज जेवढे आमदार निवडून आले आहेत, त्यामागे स्थानिक कार्यकर्त्यांचे समर्पण आहे. बंगालमध्ये वाढलेल्या जागा व मतांची वाढलेली टक्केवारी ही कार्यकर्त्यांना समर्पित आहे. परंतु ही हिंसा थांबली पाहिजे. जय श्रीराम,’ असंही प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र भाजपकडून मोठी घोषणा
पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रातही उमटताना दिसत आहेत. या हिंसाचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र भाजपकडून निदर्शने करण्यात येणार आहेत. ‘निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर हिंसाचार सुरू केला असून भाजपा कार्यकर्त्यांचे खून करण्यात येत आहेत. या राजकीय हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते उद्या राज्यभर ठिकठिकाणी निदर्शने करणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे,’ असं भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.