गावांमधील नागरिक चिंताग्रस्त
म. टा. वृत्तसेवा, अलिबाग
रायगड जिल्ह्यातील तळीये व पोलादपूर येथील कानवळे व सुतारवाडी येथील दरड दुर्घटनेनंतर महाड, पोलादपूर तालुक्यातील डोंगरकपारीत असलेल्या गावातील रहिवाशांना चिंतेने पोखरले आहे. आपत्तीच्या धसक्याने जीव मुठीत घेऊन रात्र काढत आहेत. त्यातच शनिवारी रायगडच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी वाडी परिसरातील जमिनीला भेगा गेल्या असून तेथील माती ढासळू लागली असल्याने रहिवाश्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. गुरुवारी तळीये गावातील ३२ घरांवर दरड कोसळून तेथील कुटुंबे मातीखाली गाडली गेली. येथील सुमारे ४२ कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. आतापर्यंत ४० मृतदेह बाहेर काढण्यात आली असून दोन महिलांना वाचवण्यात यश आले आहे. अजूनही ४४ जण ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता आहे. गावातील आठ कुटुंबे बाहेर गावी गेली असल्याचे सांगण्यात येते.