Home ताज्या बातम्या देवेंद्र फडणवीस-जितेंद्र आव्हाड यांच्यात गुप्त बैठक, चर्चा तर होणारच!

देवेंद्र फडणवीस-जितेंद्र आव्हाड यांच्यात गुप्त बैठक, चर्चा तर होणारच!

0
देवेंद्र फडणवीस-जितेंद्र आव्हाड यांच्यात गुप्त बैठक, चर्चा तर होणारच!

मुंबई: राजधानी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढाकारानं भाजपविरोधी आघाडीच्या हालचाली सुरू असताना राज्यात मात्र वेगळंच राजकारण रंगू लागलं आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार समजले जाणारे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात तब्बल दोन ते अडीच तास गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे.

दोन दिवसांपूर्वी ही भेट झाल्याचे सूत्रांकडून समजते. पोलिसांच्या घरांबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक झाल्याचं सांगण्यात येत आहे. फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी आव्हाड यांना बीडीडी चाळीतील पोलिसांच्या घरासंदर्भात पत्र लिहिलं होतं. त्यावर या बैठकीत चर्चा झाल्याचं समजतं. मात्र, सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता राजकीय वर्तुळात या भेटीवरूनही तर्कवितर्क लढवले जात आहेत.

वाचा: राज ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केल्यानंतरही मनसेचा आमदार आंदोलनात

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात दिल्लीत झालेल्या भेटीपासून शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रताप सरनाईक यांच्या भाजपशी जुळवून घेण्याच्या मागणीमुळं यात भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस काही वेगळीच खेळी करतेय की काय, असाही अंदाज बांधला जात आहे.

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुसफूस

म्हाडाच्या १०० सदनिका परळ येथील टाटा कॅन्सर रुग्णालयाला देण्याचा निर्णय जितेंद्र आव्हाड यांनी नुकताच घेतला होता. त्याला स्थानिक आमदार अजय चौधरी यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आव्हाड यांच्या निर्णयास स्थगिती दिली होती. त्याबाबत आव्हाड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याच परिसरात १०० सदनिका देण्यास परवानगी देऊन प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. आव्हाड यांनी याबाबत आनंद व्यक्त केला असला तरी शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं बोललं जातं. त्यामुळंच प्रत्येक पक्ष आपापल्या परीनं अंदाज घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे.

वाचा:पुण्यातील आंबील ओढा येथील पाडकामाला स्थगिती; कोर्टाचा आदेश येताच…

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शरद पवारांच्या पुढाकारानं राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं असलं तरी त्यापूर्वी २०१४ साली राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपला विनाअट पाठिंबा देऊ केला होता, हा इतिहासही नाकारता येत नाही. फडणवीस आणि आव्हाड यांची भेट यामुळंच महत्त्वाची मानली जात आहे.

Source link