Home बातम्या महत्वाच्या बातम्या नरक चतुर्दशीला पहाटे का करतात अभ्यंगस्नान, घ्या जाणून

नरक चतुर्दशीला पहाटे का करतात अभ्यंगस्नान, घ्या जाणून

0

दिपोत्सव सुरू झाला आहे. देशभरात दिवाळीची तयारी सुरू आहे. रविवारी नरक चतुर्दशी आहे. या दिवशी पहाटे उठून अभ्यंगस्नान केले जाते. पण असे का केले जाते याचे कारण अनेकांना माहिती नसते. आज आपण हे कारण जाणून घेणार आहोत.

नरकासुराने 16 हजार 108 स्त्रियांना आपल्या बंदीखान्यात डांबून ठेवले होते. हा नरकासूर प्रजेचाही खूप छळ करायचा. भगवान श्रीकृष्णांनी या नरकासुराचा वध केला होता. आश्विन कृष्ण चतुर्दशीला श्रीकृष्णांनी या स्त्रीयांची मुक्तता केली होती. यावेळी नरकासुराने श्रीकृष्णाकडे वर मागितला की, आजच्या तिथीला जो मंगलस्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये. म्हणून नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान करणे महत्त्वाचे मानले आहे.

शरद् ऋतूचा शेवट आणि हेमंत ऋतूचे आगमन अशा संधीकालावर दिवाळीचा सण साजरा करतात. यावेळी पुढे येणाऱ्या थंडीच्या काळासाठी तेल लावून स्नान करण्याची सुरुवात नरक चतुर्दशीच्या अभ्यंगस्नानापासून केली जाते. नरक चतुर्दशीच्या दिवशी यमतर्पण करण्यास सांगितले आहे. पूर्वीपेक्षा सध्याच्या काळात वेगाने चालवल्या जाणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचे भय वाढले आहे. अपघात, धावपळीचे जीवन, इ. अनेक कारणांमुळे अपमृत्यूचा संभव वाढत असल्याने नरकचतुर्दशीला यमतर्पण करून अपमृत्यु निवारणासाठी यमाची प्रार्थना सर्वांनी करणे आवश्यक आहे. अपमृत्यु येऊ नये म्हणून यमाला खालील 14 नावांनी तर्पण करून त्याची प्रार्थना करण्यास सांगितले जाते. वडील हयात असलेल्यांनी पाण्यात अक्षता घालून व नसलेल्यांनी पाण्यात तीळ घालून खालील नावांनी तर्पण करावे. 1) यम, 2) धर्मराज, 3) मृत्यु, 4) अंतक, 5) वैवस्वत, 6) काल, 7) सर्वभूतक्षयकर, 8) औदुंबर, 9) दध्न, 10) नील, 11) परमेष्ठिन, 12) वृकोदर, 13) चित्र, 14) चित्रगुप्त