
मुंबई, दि. ११ : राज्य शासन नवीन खनिज धोरण करत आहे. प्रस्तावित खनिज धोरण सर्वसमावेशक बनविण्यासाठी सर्वांच्या सूचनांचा विचार केला जाईल, प्रत्येकाने आपली मते याबाबत मांडावीत, असे आवाहन खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
मंत्रालय येथे नवीन प्रस्तावित खनिज धोरणाबाबत आढावा बैठक पार पडली या बैठकीत खनिकर्म मंत्री श्री. देसाई बोलत होते. यावेळी वित्त राज्यमंत्री डॉ.आशिष जयस्वाल, खनिकर्म विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. इकबालसिंह चहल, खनिज कायदा सल्लागार ॲड बी.के.शुक्ला, राजेंद्र कोरडे उपस्थित होते.
राज्य शासनाने खाणपट्टे सुरू करण्याबाबत करावयाची कार्यवाही, तज्ज्ञ व जाणकार यांची मते, नागरिकांची मते, केंद्र व राज्य शासन यांचा समन्वय, राज्यस्तरावर खाण, वन, पर्यावरण आणि महसूल विभागांमधील समन्वयासाठी यंत्रणा तयार करणे, भूवैज्ञानिक अहवालांच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करणे, दफ्तर दिरंगाई टाळणे, खाणपट्टे लिलाव प्रक्रियेमध्ये व इतर कामांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता व यंत्र अभ्यासाचा अधिकाधिक वापर करणे, महसूल विभागाकडे उपलब्ध असलेल्या शासकीय जमिनींची माहिती ऑनलाईन उपलब्ध करून देणे, ज्या खाणी कार्यरत नाहीत अथवा कालबाह्य झालेल्या आहेत त्यांचे विश्लेषण करणे यासह इतर सर्वसमावेशक बाबींचा अभ्यास करून लवचिक आणि आधुनिक धोरण तयार करणे गरजेचे असल्याचेही खनिकर्म मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.
००००
संध्या गरवारे/विसंअ/