‘देवनार कत्तलखान्यात ३००ची घातलेली मर्यादा कमी आहे. त्याऐवजी बकरी ईद उत्सवात ७०० ते एक हजार गुरांची कत्तल करण्याची परवानगी देण्याचे निर्देश पालिकेला द्यावेत,’ अशी विनंती याचिकादारांनी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाला केली होती. त्यावर, ‘महापालिकेने गेल्यावर्षी करोनाचे संकट लक्षात घेऊन केवळ ५० गुरांविषयी परवानगी दिली होती. यावेळी परिस्थिती तितकी तीव्र नसल्याने ३०० गुरांबाबत परवानगी दिली आहे. करोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी खबरदारीचे उपाय आवश्यक आहेत,’ असे म्हणणे पालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी मांडले.
‘किती गुरांच्या कत्तलीला परवानगी द्यायची, हा निर्णय प्रशासनाच्या अखत्यारित आहे. संकट अद्याप दूर झाले नसून नागरिकांच्या जीवितरक्षणासाठी सरकारी प्रशासने शर्थीचे प्रयत्न करत असल्याचे सर्वांनीच लक्षात घ्यायला हवे. अशावेळी धार्मिक हितांपेक्षा व्यापक सार्वजनिक हिताला महत्त्व देणे आवश्यक आहे’, असे निरीक्षण नोंदवत खंडपीठाने दोन्ही याचिका निकाली काढल्या.