नाशिक: खड्ड्याने घेतला चिमुरड्याचा बळी

- Advertisement -

खड्ड्यात पडून लहान मुलांचा जीव गेल्याच्या अनेक घटना मागील काही दिवसांपासून घडत आहेत. नाशिकच्या कबीर नगरमध्येही खड्ड्यात पडून चिमुरड्याला जीव गमवावा लागल्याची दुर्देवी घटना घटडली आहे. आज सकाळी साडे नऊ वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेमुळे कबीर नगरपरिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

अक्षय साठे (वय ६) असे या मुलाचे नाव आहे. नाशिकमधील संत कबीर नगर येथील मनपाच्या शाळेत पहिलीच्या वर्गात अक्षय शिकत होता. आज सकाळी सात वाजता तो शाळेत गेला. पण शाळेतील शिक्षकांनी आधार कार्ड आणायला सांगितल्यामुळे साडे नऊच्या सुमारास अक्षय पुन्हा घरी चालला होता. शाळा ते घर या रस्त्यात एका घराचे बांधकाम चालू होते. त्या बांधकामासाठी खणलेल्या खड्ड्यात अक्षय पडला. या खड्ड्यात पावसाचे पाणी साठल्यामुळे पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. 

बांधकाम सुरू असलेल्या भागात कोणतीही संरक्षक भिंत नव्हती. त्यामुळे अक्षयला हा खड्डा दिसला नसल्याने ही दुर्देवी घटना घडल्याचं सूत्रांनी सांगितलं. शाळेतील शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना या घटनेची कोणतीही कल्पना नव्हती. दुपारी १२ वाजता शाळा सुटल्यानंतर अक्षय घरी आला नाही तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी शोधाशोध चालू केली असता हा प्रकार उघडकीस आला. सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. 

- Advertisement -