हायलाइट्स:
- पंढरपूरच्या वारीवरून राष्ट्रवादी-भाजप आमनेसामने
- पायी वारीचा भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचा आग्रह
- राष्ट्रवादी काँग्रेसची तुषार भोसलेंवर जोरदार टीका
पंढरीची वारी हा महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांसाठी एक आनंदसोहळा असतो. विठ्ठलाच्या ओढीनं लाखो वारकरी दरवर्षी पंढरीची वाट चालत असतात. शेकडो वर्षांपासून ही परंपरा अखंड सुरू आहे. मात्र, करोनाच्या भयंकर संकटामुळं मागील वर्षी पायी वारीच्या सोहळ्यामध्ये खंड पडला होता. प्रातिनिधिक स्वरूपात हा सोहळा साजरा करण्यात आला होता.
वाचा: रुग्णालयातून डिस्चार्जची तयारी सुरू असतानाच रुग्णानं घेतला गळफास
आता आषाढी वारी जवळ आल्यानं त्यावरून पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे. यावर्षी पायी वारी झालीच पाहिजे, असा आग्रह भाजपनं धरला आहे. निर्बंधासह का असेना, पण पायी वारी व्हावी अशी वारकऱ्यांची इच्छा असल्याचा दावा भाजपनं केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळकाढूपणा न करता त्वरीत वारकऱ्यांसोबत चर्चा करुन नियमावली तयार करावी. पायी वारीच्या बाबतीत यंदा आम्ही कोणतीही तडजोड स्वीकारणार नाही,’ असा इशारा भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी दिला आहे.
वाचा: राज्यातील लॉकडाऊन सोमवारपासून टप्प्याटप्प्याने उठणार; ‘हे’ आहेत निकष
भाजपच्या या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसनं कडाडून हल्ला चढवला आहे. ‘तुषार भोसले हा वारकऱ्यांचा प्रतिनिधी नसून वारकऱ्यांच्या जिवाशी खेळणारा एक भोंदू व्यक्ती आहे. हा माणूस वारी व्हावी अशी मागणी आज करतोय. पण, या वारीमध्ये करोनाचा संसर्ग वाढल्यास आमच्या वारकरी बांधवांच्या जीविताला जो धोका निर्माण होईल, त्याविषयी या माणसाला काहीच घेणेदेणे नाही,’ असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते भूषण राऊत यांनी म्हटलं आहे.
वाचा: चिंता वाढली; करोनामुक्त होऊनही ‘या’ लक्षणांनी रुग्ण हैराण