हायलाइट्स:
- शरद पवारांच्या भाजपविरोधी आघाडीच्या प्रयत्नांवरून चर्चेला उधाण
- शरद पवार यांच्या प्रयत्नांचं स्वागतच – पृथ्वीराज चव्हाण
- पवारांच्या प्रयत्नांमुळं काँग्रेसला चिंता वाटण्याचं कारण नाही – चव्हाण
‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. शरद पवारांनी भाजपविरोधी आघाडी उभी करण्याचे प्रयत्न चालवला आहे. काँग्रेसची यात काय भूमिका असेल, असं पृथ्वीराज यांना विचारण्यात आलं होतं. त्यावर त्यांनी पवारांच्या प्रयत्नांचं स्वागत केलं. ‘शरद पवारांनी काही विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. तो त्यांचा अधिकार आहे. मोदी आणि भाजपपासून सुटका करून घेण्यासाठी अशा सर्वच पक्षांना शेवटी एकत्र यावं लागणार आहे. ही एकजूट नेमकी कशी होणार हे येणारा काळच सांगेल,’ असं चव्हाण म्हणाले.
वाचा: ‘काँग्रेसला नंबर एकचा पक्ष व्हायचं असेल तर त्यात चुकीचं काय?’
‘शरद पवार हे भाजपच्या विरोधात लढत असतील तर त्यांचं स्वागतच आहे. आम्हाला त्याबद्दल चिंता वाटण्याचं कारण नाही. प्रादेशिक पक्षांकडं दुर्लक्ष केलं जाऊच शकत नाही. या पक्षांनी अनेक राज्यं जिंकली आहेत. त्यामुळं त्यांची साथ महत्त्वाची ठरणार आहे,’ असंही चव्हाण म्हणाले.
राज्यातील महाविकास आघाडी भक्कम आहे, असंही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केलं. ‘भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या उद्देशानं ही आघाडी स्थापन झाली आहे. भाजपनं राज्यात गोंधळ घातला होता यावर तिन्ही पक्षांचं एकमत आहे. त्यामुळं आघाडी कायम राहील,’ असं चव्हाण म्हणाले. काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेचं व मुख्यमंत्रिपदाच्या महत्त्वाकांक्षेचंही त्यांनी कौतुक केलं. ‘काँग्रेस राज्यात सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. एक नंबरवर जाण्याची इच्छा ठेवली तर त्यात बिघडलं कुठं? मुख्यमंत्रिपदाचं म्हणाल तर, आघाडीमध्ये सर्वाधिक आमदार असलेल्या पक्षाला मुख्यमंत्रिपद मिळतं असं सूत्रच आहे,’ असं चव्हाण यांनी म्हटलंय.
वाचा: शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीला शिवसेना नाही, कारण…