सिंधुदुर्गनगरी, दि. १९ (जिमाका) : जलसंपदा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आधुनिक सुविधा, सुरक्षित वातावरण आणि दर्जेदार निवास उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात येणाऱ्या ‘जलसिंधू’ या निवासी संकुलाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले.

‘जलसिंधू ‘ निवासी संकुल प्रकल्प शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण जीवनमान उपलब्ध करून देणारा उपक्रम आहे. या वसाहतीचा आराखडा उत्कृष्ट असून बांधकामाची गुणवत्ता सर्वोत्तम असली पाहिजे. प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे हा संपूर्ण प्रकल्प दीड वर्षाच्या आत दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावा. कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या माध्यमातून साकारल्या जाणाऱ्या या निवासी संकुलामुळे जलसंपदा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सर्व आवश्यक सुविधांनी युक्त, सुरक्षित आणि सुसज्ज निवास व्यवस्था उपलब्ध होणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यास मदत होणार असून विभागाच्या कामकाजाला अधिक गती मिळेल, असा विश्वास यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, मुख्य अभियंता मिलिंद नाईक, अधीक्षक अभियंता पद्माकर पाटील, कार्यकारी अभियंता अमोल चोपडे, कणकवली पंचायत समितीच्या सभापती हर्षदा वाळके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यकारी अभियंता अमोल चोपडे यांनी सदर निवासी संकुलामध्ये असणाऱ्या सोयी सुविधेविषयी माहिती दिली. ते म्हणाले या प्रकल्पाचे काम दिड वर्षात पूर्ण करून पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
000000






















WhatsApp