पालकमंत्री, मंत्री, जिल्हाधिकारी उच्चपदस्थांनी केले शाळेतल्या पहिल्या पावलाचे स्वागत – महासंवाद

पालकमंत्री, मंत्री, जिल्हाधिकारी उच्चपदस्थांनी केले शाळेतल्या पहिल्या पावलाचे स्वागत – महासंवाद
- Advertisement -

छत्रपती संभाजीनगर, दि.१६ (जिमाका): शाळेत पडणारे पहिले पाऊल हे ज्ञानाकडे पडते. ज्ञानाकडे पडलेल्या पहिल्या पावलाचे आज जिल्हाभरात मोठ्या उत्साहात स्वागत झाले. हे स्वागत करण्यासाठी हजर होते दस्तुरखुद्द पालकमंत्री, मंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी विविध उच्चपदस्थ अधिकारी, लोकप्रतिनिधी आदी. जिल्हाभरात आज शाळाप्रवेशाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. शाळेत येणाऱ्या नव्या विद्यार्थ्यांचे शाळेत आलेले पहिले पाऊल पुष्प, भेटवस्तू,मिठाई, सवाद्य मिरवणूक अशा उत्साहात साजरे झाले.

जि.प. केंद्र शाळा सातारा येथे पालकमंत्री शिरसाट यांनी केले चिमुकल्यांचे स्वागत

शाळेचा पहिला दिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस. विद्यार्थ्यांचा शाळेतील प्रवेशाचा पहिला दिवस हा त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा देशपातळीवर नावलौकिक करणारा ठरावा. या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक पालक यांनी पुढाकार घ्यावा,असे आवाहन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केले. सातारा जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेत शाळा प्रवेश उत्सवावेळी पालकमंत्री शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित,  शिक्षण अधिकारी प्राथमिक जयश्री चव्हाण, मुख्याध्यापक भावले, शाळेत प्रवेशित विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे पालक आणि शिक्षक वृंद या कार्यक्रमास उपस्थित होते.

पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी हा सर्व गुण संपन्न व प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणारा उत्कृष्ट नागरिक बनावा यासाठी जिल्हा परिषद शाळा आणि शिक्षण विभागाने प्रयत्न करावेत, शाळेच्या गुणवत्ता व सेवा सुविधासाठी शासनाचा निधी कमी पडू देणार नाही. राज्यात आज सर्वत्र शिक्षण क्षेत्रामध्ये महत्त्वाचा दिवस असून प्रथम प्रवेश घेणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव संस्मरणीय आणि उत्साहपूर्ण व्हावा यासाठी शासन स्तरावर प्रत्येक अधिकारी, मंत्री, लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत शाळेमध्ये प्रवेश उत्सव साजरा होत आहे. शासनाच्या जिल्हा परिषद अंतर्गत असणाऱ्या शाळा मधील शिक्षणाचा दर्जा गुणवत्ता पूर्ण करण्यासाठी शासन नेहमीच पुढाकार घेत आहे. या शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण ,विज्ञान. तंत्रज्ञान ,आरोग्य तपासणी, क्रीडा विकास, मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके, आहार याबरोबरच सर्वांगीण शिक्षण होण्यासाठी पोषक वातावरण शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनाने उपलब्ध करुन दिल्या बद्दल पालकमंत्री शिरसाट यांनी कौतुक केले. कार्यक्रमात पाठ्यपुस्तक व गणवेशाचे वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

अशोकनगर, ब्रिजवाडीत इमावकल्याण मंत्री सावे यांच्या उपस्थितीत प्रवेशोत्सव

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अशोक नगर आणि ब्रिजवाडी येथील शाळेत इतर मागास वर्ग बहुजन कल्याण, दुग्धविकास तसेच दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत मंत्री सावे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गणवेश वितरित करण्यात आले.

मंत्री सावे म्हणाले की, महानगरपालिकेच्या सर्व शाळा स्मार्ट झाल्या असून या शाळेत सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. कॉम्प्युटर लॅब, ग्रंथालय तसेच खेळाचे मैदान हे सुद्धा उपलब्ध असल्यामुळे मनपा शाळांची पटसंख्या वाढलेली दिसून येते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत.  या प्रसंगी राजू शिंदे, उपायुक्त अंकुश पांढरे, शिक्षण अधिकारी भारत तीनगोटे, कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे, मुख्याध्यापक संजय मडके व तिलोत्तमा मापारी तसेच शिक्षक विद्यार्थी आणि पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

सुदामवाडी येथे जिल्हाधिकारी बनले सारथी

जि.प. उच प्राथमिक शाळा सुदामवाडी केंद्र बोरसर येथे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. या विद्यार्थ्यांना सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये बसवून त्यांना शाळेत आणण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे स्वतः या ट्रॅक्टरचे सारथी बनले.  सरपंच शोभाताई जगधने, उपसरपंच अर्चनाताई शेवाळे, नायब तहसिलदार महाजन, मंडळ अधिकारी फालक, जितेंद्र चापानेरकर, प्राचार्य वैद्य, प्रा. बाबासाहेब सोनवणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप पवार, पद्माकर शेवाळे, शिक्षण विस्तार अधिकारी अनिल पुदाट, केंद्रप्रमुख दिलीप ढमाले, संजय शिंदे तसेच सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गणवेश, पुस्तके आदी वाटप करण्यात आले. त्यांचे भेटवस्तू आदी देऊन स्वागत करण्यात आले. जिल्ह्याभरात आज सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सर्व अधिकारी उपस्थित होते.

०००

- Advertisement -