Home शहरे मुंबई पावसामुळे एसटीला १३ लाखांचा फटका , प्रवाशांची संख्या घटली

पावसामुळे एसटीला १३ लाखांचा फटका , प्रवाशांची संख्या घटली

ठाणे : उशिरा पण, जोरदार सुरू पावसाचा फटका महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागालाही काही प्रमाणात बसला आहे. सोमवार आणि मंगळवारच्या पावसामुळे ठाणे विभागात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या घटल्याने दोन दिवसांमध्ये सरासरी १३ लाख रुपयांवर एसटी विभागाला पाणी सोडावे लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे विभागात एकूण आठ आगारे आहेत. या आगारांतून निघणाऱ्या बस दिवसाला साधारणत: एक लाख ८१ हजार किलोमीटर प्रवास करत असल्याची नोंद आहे. त्यातच, पावसामुळे सोमवारी प्रवासीसंख्या घटल्याचे पाहून बस रस्त्यावर उतरल्याच नाहीत.त्यामुळे सोमवारी १९ हजार किलोमीटर प्रवासीअंतर दररोजच्या किलोमीटरपेक्षा कमी झाले आहे. तसेच मंगळवारी शासनाने शासकीय सुटी जाहीर केल्याने प्रवासीसंख्या ही कमीच होती. त्यामुळे गाड्या बाहेर न काढल्याने मंगळवारीही १७ हजार किलोमीटर प्रवासीअंतर कमी झाले.
या दोन्ही दिवसांच्या कमी झालेल्या किलोमीटर अंतराचा सरासरी विचार केल्यास ठाणे विभागाचे दोन दिवसांतील उत्पन्न जवळपास १२ ते १३ लाख रुपयांनी कमी झाल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.