Home ताज्या बातम्या पुरस्थितीत नौदलाची मदत घेण्यात दिरंगाई; राज्य सरकारची विलंबाने मागणी

पुरस्थितीत नौदलाची मदत घेण्यात दिरंगाई; राज्य सरकारची विलंबाने मागणी

0
पुरस्थितीत नौदलाची मदत घेण्यात दिरंगाई; राज्य सरकारची विलंबाने मागणी

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

पावसाळा सुरू होतानाच कुठल्याही आपत्तीचा सामना करण्यासाठी नौदल व तटरक्षक दलाच्या तुकड्या सज्ज असतात. तशा त्या यंदाही होत्याच. पण रायगड व रत्नागिरीत पूर आल्यानंतर या तुकड्यांना मदतसाठी पाचारण करण्यास प्रशासनाकडून कमालीची दिरंगाई करण्यात आली. त्यामुळे बचावकार्यातील अत्यंत महत्त्वाचा एक दिवस वाया गेला.

मुंबईत नौदलाच्या पश्चिम कमांडचे मुख्यालय आहे. नौदलाने मुंबईत पाच ठिकाणी बचाव पथके पावसाळ्याच्या आधीपासून सज्ज ठेवली आहेत. रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात गुरुवारच्या पहाटेपर्यंट धो-धो झालेल्या मुसळधारेने पूरस्थिती उद्भवली. पुराने भीषण रूप घेतल्याचे सकाळी ९ वाजताच्यादरम्यान स्पष्ट झाले होते. त्यामुळे बचावकार्यासाठी जावे लागणार, अशी तयारी नौदलाच्या या पाचही ठिकाणच्या पथकांनी केली होती. पण प्रशासनाकडून मदतीची मागणीच आली नाही.

पूरस्थिती गंभीर असल्याने मदतीसाठी पथके जाणार का, याची माहिती ‘महाराष्ट्र टाइम्स’ गुरुवार सकाळपासून नौदलाकडून सातत्याने घेत होते. परंतु सकाळी ११, दुपारी १, दुपारी ४ वाजेपर्यंतही प्रशासनाकडून नौदलाकडे मदतीची मागणी आलेली नव्हती. अखेर सायंकाळी ६ नंतर नौदलाला राज्य सरकारकडून मदतीची विनंती करण्यात आली. त्यावेळी नौदलाची पाच पथके तातडीने रस्तामार्गे रत्नागिरीकडे रवाना झाले. पण त्यांना तेथे पोहोचायला गुरुवारची मध्यरात्री उलटली. त्यामुळे बचावकार्य शुक्रवारी सकाळी सुरू करावे लागले. त्याऐवजी गंभीरता पाहून व योग्य समन्वय साधून राज्य सरकारने गुरुवारी सकाळीच नौदलाला कळवले असते तर सायंकाळपर्यंत किमान २०० हून अधिक नागरिकांचा बचाव करता आला असता. शुक्रवारी बचावकार्याला जोर आला असता.

दुसरीकडे तटरक्षक दलाच्या मुरूड येथील तळावरही बचाव पथके सज्ज होती. परंतु तटरक्षक दलालाही स्थानिक प्रशासनाने दुपारी १ नंतर मदत मागितली. त्यामुळे त्यांचाही बचावकार्य करण्याचा गुरुवारचा अर्धा दिवस वाया गेला

जिल्हा प्रशासन आपत्तीत पोरकेच

पूरस्थिती किंवा दरड कोसळण्यासारख्या नैसर्गिक आपत्तीवेळी जिल्हा प्रशासन पोरकेच ठरत असल्याचे कोकणात सध्या आलेल्या पुरामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. अशा नैसर्गिक आपत्तीप्रसंगी जिल्हा प्रशासनास नौदल, तटरक्षक दल व एनडीआरएफवरच अवलंबून राहावे लागत असल्याचे दिसून आले आहे. एनडीआरएफ दाखल होण्यास विलंब होत असल्याने बचावकार्यही तातडीने सुरू होऊ शकत नसल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे.

Source link