
धाराशिव,दि. ६ सप्टेंबर (जिमाका) ‘‘पैशांअभावी कोणताही गरजू रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये, ही राज्य शासनाची भूमिका आहे. आरोग्य शिबिरात उपचारासाठी आलेल्या प्रत्येक रुग्णाची काळजी घेतली जाईल. त्याच्या आजाराचे दुःख कमी करून आवश्यक उपचार मिळवून देण्यासाठी शासनाची आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी मदत करेल,अशी ग्वाही आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.
आज, (दि. ६ सप्टेंबर) उमरगा तालुक्यातील मुरूम येथील श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष,जिल्हा आरोग्य विभाग आणि शरण पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघस्तरीय ‘मुख्यमंत्री समुदाय आरोग्य शिबिर-२०२६’चे उद्घाटन राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते झाले.त्यानंतर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यसभा सदस्य खासदार डॉ. अजित गोपछडे होते.विधानपरिषद सदस्य आमदार बसवराज पाटील, विधानसभा सदस्य आमदार प्रवीण स्वामी,मुरूम नगरपरिषदेचे अध्यक्ष बापूराव पाटील,मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे आरोग्य उपसंचालक डॉ.स्वानंद सोनार आणि लातूर विभागाच्या आरोग्य उपसंचालक डॉ.रेखा गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीमती.साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या,आधुनिक उपचार पद्धतींचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यात येत आहे.आरोग्य व्यवस्थेमध्ये आशा सेविकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून, त्यांना स्मार्टफोन देण्याची मागणीही पूर्ण करण्यात येईल.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत पाच लाख रुपयांपर्यंत उपचाराची सुविधा उपलब्ध आहे.मुख्यमंत्री सहायता निधीतूनही गरजू रुग्णांच्या उपचारासाठी मदत केली जात आहे.अवयव प्रत्यारोपणासाठी २४ लाख रुपयांपर्यंत मदत दिली जात असल्याचे साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.

‘उमरगा येथे १०० खाटांचे महिला रुग्णालय उभारण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करण्यात येतील.मुरूम आणि लोहारा येथे प्रत्येकी ५० खाटांची उपजिल्हा रुग्णालये तसेच उमरगा येथे ट्रॉमा केअर सेंटर स्थापन करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल,असे साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.
ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा जवळच्या ठिकाणी मिळावी, यासाठी आरोग्यविषयक पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यावर शासनाचा भर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.आरोग्य शिबिरात उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या अडचणी दूर करून त्यांना आवश्यक उपचार मिळवून देण्यास प्राधान्य दिले जाईल.शिबिरापुरती आरोग्यसेवा मर्यादित न ठेवता गरजू रुग्णांना पुढील आवश्यक उपचार मिळवून देण्यासाठीही प्रयत्न केले जातील,असे त्यांनी सांगितले.
राज्य शासनाने ५६ लाख शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देऊन मोठा दिलासा दिला आहे.असे सांगून त्या म्हणाल्या की, जिल्ह्यातील वीजेच्या समस्याही टप्प्याटप्प्याने सोडविण्यात येतील. महावितरणची मंजूर असलेली सर्व उपकेंद्रे पूर्ण करण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल,असे साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.मराठवाड्यातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांमुळे मराठवाडा सुजलाम-सुफलाम होईल आणि पुढील पिढ्यांना दुष्काळ पाहण्याची वेळ येणार नाही,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
खासदार डॉ.अजित गोपछडे म्हणाले,या मतदारसंघातील आरोग्याच्या प्रश्नांवर फुंकर घालण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा लाभ अनेक नागरिकांना होणार आहे.मराठवाडा हा दुष्काळी भाग असून,कोकणात वाया जाणारे पावसाचे पाणी मराठवाड्यात आणण्यात येणार आहे.मुख्यमंत्र्यांच्या दूरदृष्टीतून ‘मराठवाडा ग्रीड’च्या माध्यमातून मराठवाडा सुजलाम -सुफलाम करण्यात येणार आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून मतदारसंघातील आरोग्य क्षेत्रासाठी कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही.केंद्र सरकारच्या विविध निधीतून मतदारसंघासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. अशा प्रकारची आरोग्य शिबिरे संपूर्ण मराठवाड्यात आयोजित झाली पाहिजेत.ग्रामीण व गरजू नागरिकांना त्यातून आरोग्यसेवांचा प्रत्यक्ष लाभ मिळेल,असे सांगत खासदार डॉ.गोपछडे यांनी उमरगा येथे महिला रुग्णालय उभारण्याची मागणी आरोग्य राज्यमंत्र्यांकडे केली.

आमदार बसवराज पाटील म्हणाले,आरोग्य विभागाच्या सहकार्याने शरण पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून मतदारसंघात आरोग्य शिबिर आयोजित करून नागरिकांना दिलासा देण्याबरोबरच त्यांच्या वेदना कमी करण्याचे काम करण्यात येत आहे.राज्यात विविध प्रकारच्या आरोग्य शिबिरांचे आयोजन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम केले आहे.अशा शिबिरांमुळे गरजू नागरिकांना आवश्यक तपासणी आणि उपचारांची सुविधा उपलब्ध होण्यास मदत होत आहे.’’या भागात सध्या दुष्काळी परिस्थिती असून,दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मराठवाड्याच्या दोन-दोन पिढ्यांनी दुष्काळाच्या झळा सोसल्या आहे. येणाऱ्या पिढ्यांना दुष्काळ पाहण्याची वेळ येऊ नये,यासाठी मुख्यमंत्री फडणवीस प्रयत्नशील आहेत,असेही श्री.पाटील यांनी सांगितले.
आमदार प्रवीण स्वामी म्हणाले, ‘‘मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा सहज उपलब्ध व्हावी,या उद्देशाने आयोजित केलेले हे आरोग्य शिबिर अत्यंत कौतुकास्पद आहे.अशा शिबिरांमुळे उपचारांची गरज असलेल्या नागरिकांना एकाच ठिकाणी तपासणी,निदान आणि आवश्यक वैद्यकीय सेवेचा लाभ मिळून मोठा दिलासा मिळतो. मतदारसंघातील महावितरणच्या सहा उपकेंद्रांना मान्यता दिल्याबद्दल त्यांनी राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांचे आभार मानले.गेल्या दोन महिन्यांपासून पाऊस नसल्याने तालुक्यातील शेतकरी अडचणीत असून, शासनाने त्यांना मदतीचा हात द्यावा,अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
उमरगा येथे १०० खाटांचे स्वतंत्र महिला रुग्णालय उभारण्यात यावे, अशी मागणी आमदार स्वामी यांनी केली.आरोग्य विभागातील रिक्त पदांचा परिणाम नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्यसेवेवर होत असल्याने आकृतिबंधानुसार आवश्यक पदांची भरती तातडीने करावी.ज्या आरोग्य संस्थांमध्ये वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कमतरता आहे,तेथे प्राधान्याने पदे भरून मतदारसंघातील नागरिकांना वेळेवर व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात,अशी अपेक्षाही श्री.स्वामी यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत आणि ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते क्षय रुग्णांना, पोषण आहार किट आणि आयुष्मान भारत कार्डचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरण पाटील यांनी केले.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

WhatsApp