Home बातम्या पोलिसांच्या दुर्लक्षामुळे टारगट युवकांचे फावले

पोलिसांच्या दुर्लक्षामुळे टारगट युवकांचे फावले

0

नंदुरबार : विविध शाळा, महाविद्यालयांचा परिसर आणि चौकातील टारगट युवकांचा उच्छाद पुन्हा वाढला आहे. शहर आणि उपनगर पोलिसांच्या निष्क्रियता त्याला कारणीभूत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, चौकाचौकातील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करून आवश्यक त्या ठिकाणी पुन्हा लावण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. नंदुरबारातील रोडरोमियो युवकांनी पुन्हा उच्छाद मांडला आहे. यामुळे महिला, तरुणी आणि विद्यार्थीनी हैराण झाल्या आहेत. ठिकठिकाणी अशा युवकांचे टोळके शहरात दिसून येते. विशेषत: शाळांच्या आवारात आणि खाजगी क्लासच्या आवारातील हे टोळके पोलिसांच्या नाकावर टिच्चून टारगटपणा करीत आहेत.
चौकाचौकात वावर..
शहरातील  डी. आर.विद्यालयासमोरील चौक आणि दिनदयाल चौक, श्रॉफ विद्यालयासमोरील चौक, मोठा मारुती मंदीर परिसर, कमला नेहरू कन्या विद्यालय आणि एकलव्य विद्यालय परिसर, मिशन विद्यालय परिसर, जीटीपी कॉलेज परिसर आदी भागात या युवकांचा नेहमीच वावर असतो. अशा भागातून जाणा:या महिला, तरुणी, विद्यार्थीनी यांना त्रास देण्याचा प्रकार या युवकांकडून केला जातो. यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. पूर्वी पोलिसांचे दामीनी पथक आणि साध्या वेशातील पोलिसांची गस्त शाळा परिसरात आणि चौकांमध्ये राहत होती. त्यामुळे टारगट युवकांना आळा बसला होता. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून पोलिसांची गस्तच बंद झाली आहे. नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक यांची निष्क्रीय भुमिका त्याला कारणीभूत ठरली आहे. याबाबत पोलीस अधीक्षकांनीच संबधीत अधिका:यांचे कान टोचावे अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे वाढवावे
शहरातील काही भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. परंतु अनेक मुख्य चौक व धार्मिक  स्थळ आणि शाळा परिसर त्यापासून सुटले आहेत. त्यामुळे नव्याने सव्र्हे करून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी होत आहे. सध्या सर्वात रहदारीचा आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने संवेदनशील म्हणून मोठा मारुती मंदीर परिसर ओळखला जातो. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा आवश्यक आहे. या शिवाय दिनदयाल चौकात देखील कॅमेरे वाढविण्याची आवश्यकता आहे. याबाबत पोलीस दलाने गांभिर्याने घेणे आवश्यक   आहे.