Home शहरे मुंबई प्रतापगडावर जाण्यासाठी होणार रोप वे – पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

प्रतापगडावर जाण्यासाठी होणार रोप वे – पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

मुंबई: छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा साक्षीदार असलेल्या किल्ले प्रतापगडावर पर्यटकांना पोहोचण्यासाठी जावळी गाव (ता. महाबळेश्वर) ते प्रतापगड असा रोपवे होणार आहे. पर्यटन धोरण 2016 अंतर्गत या रोपवे प्रकल्पाला विशाल प्रकल्प म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या पुर्ततेनंतर पर्यटकांना किल्ले प्रतापगडावर जाणे सोपे होणार आहे,अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

हा रोपवे जावळी गाव (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) येथून सुरू होणार आहे. जावळी गाव ते लँडविक पॉईंट तसेच प्रतापगड असा हा 5.6 किमी लांबीचा विशाल रोपवे प्रकल्प असेल. या प्रकल्पामुळे भविष्यात प्रतापगडावर येणाऱ्या पर्यटकांना चढण्यासाठी लागणारा वेळ कमी होणार असून गडावर जाणे सोयीचे होणार आहे. राज्यातील गडकोट किल्ले संवर्धनासाठी शासन व्यापक प्रयत्न करीत आहे. प्रतापगडावर होणारा रोपवे प्रकल्प हा आशिया खंडातील सर्वाधिक लांबीचा प्रकल्प असेल. या रोपवेमुळे महाराष्ट्राच्या पर्यटन वैभवात भर पडणार आहे. यामुळे पर्यटकांची संख्याही वाढणार असून छत्रपती शिवरायांचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे, असे पर्यटन मंत्री श्री. रावल यांनी सांगितले.

स्वराज्याच्या इतिहासाचा किल्ले प्रतापगड हा दुर्ग महत्वाचा साक्षीदार आहे. इतिहास प्रेमी पर्यटकांची किल्ले प्रतापगड पाहण्यासाठी नेहमीच मोठी गर्दी असते. प्रामुख्याने शनिवार आणि रविवारी आणि सुटीच्या दिवशी पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटनासाठी जातात. प्रतापगडावर जाण्यासाठी घाटरस्त्याचा वापर करावा लागतो. मात्र, गडावर जाण्यासाठी अरुंद घाटरस्ता असल्याने वाहतुकीची कोंडी होते. तसेच पावसाळ्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या पार्श्वभूमीवर पर्यटकांना प्रतापगडावर जाणे सोयीस्कर व्हावे यासाठी रोपवे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मंत्री श्री. रावल यांनी दिली.