
मुंबई, दि. २० : महाराष्ट्रातील कृषी बाजार व्यवस्थेच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी आशियाई विकास बँकेचे (एडीबी) सहकार्य मिळण्याच्या दृष्टीने पणन मंत्री जयकुमार रावल यांचा मनीला दौरा महत्त्वपूर्ण ठरला आहे. आशियाई विकास बँकेच्या मुख्यालयात आयोजित ‘आशिया आणि पॅसिफिक अन्न प्रणाली मंच २०२६’ मध्ये सहभागी होत मंत्री जयकुमार रावल यांनी राज्यातील महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प, मुंबई आंतरराष्ट्रीय कृषी बाजार (एमआयएएम) आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (एपीएमसी) बळकटीकरणावर लक्ष केंद्रित केले. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे सरव्यवस्थापक व मॅग्नेट प्रकल्पाचे संचालक विनायक कोकरे यावेळी उपस्थित होते.
या दौऱ्यात पणनमंत्री रावल यांनी आशियाई विकास बँकेचे उपाध्यक्ष (दक्षिण, मध्य व पश्चिम आशिया विभाग) यिंगमिंग यांग यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील ‘मॅग्नेट’ प्रकल्प, मुंबई आंतरराष्ट्रीय कृषी बाजार (एमआयएएम) तसेच कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे (एपीएमसी) आधुनिकीकरण व बळकटीकरण यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. या चर्चेत कृषी मूल्य साखळी अधिक बळकट, सर्वसमावेशक आणि शाश्वत करण्यावर विशेष भर देण्यात आला.
आशियाई विकास बँकेचे महासंचालक विनफ्रेड विकलेन आणि सीनियर सेक्टर डायरेक्टर कविंगफेंग झांग यांच्यासोबतही मंत्री रावल यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्रातील कृषी पायाभूत सुविधा, काढणीपश्चात व्यवस्थापन (पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट) आणि कृषी-लॉजिस्टिक्स क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी आशियाई विकास बँकेच्या सहकार्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
या दौऱ्यामुळे राज्यातील कृषी बाजार व्यवस्थेला आधुनिक, कार्यक्षम आणि शाश्वत बनविण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहकार्याला चालना मिळणार असल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती पणन मंत्री रावल यांनी दिली.
०००
बी.सी.झंवर/विसंअ





















WhatsApp