
शिर्डी, दि. ८ – श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था यांच्यावतीने राबविण्यात येत असलेले उपक्रम म्हणजे येथे येणाऱ्या साईबाबा भक्तांसाठी प्रसाद आहे. भाविक आणि साईबाबा यांच्यातील दुवा म्हणून संस्थान काम करते, असे गौरवोद्गार राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी यांनी काढले.
शिर्डी येथे राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीची बैठक आजपासून सुरू झाली. यावेळी समिती सदस्यांनी श्री साईबाबांचे दर्शन घेतले. त्यानंतर संस्थांनच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांनी समिती अध्यक्ष आणि सदस्यांचे स्वागत केले. याप्रसंगी माहिती संचालक डॉ. गणेश मुळे, राज्य समिती सदस्य नवनाथ दिघे, प्रकाश कुलथे, नाशिक विभागीय समितीचे अध्यक्ष सुधीर लंके तसेच राज्य समितीचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी समितीचे अध्यक्ष श्री. जोशी म्हणाले, श्री साईबाबा तसेच शेगाव आणि इतर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अतिशय आस्था आणि भक्तिभावनेने भाविक येतात. विज्ञान कितीही प्रगत झाले तरी समाजातील नैतिकता टिकविण्यासाठी त्याला अध्यात्मची जोड असणे आवश्यक आहे. त्यामुळेच श्री साईबाबा समाधी मंदिर आणि इतर तीर्थक्षेत्रे नैतिकतेचे प्रभावी व्यासपीठ आहेत. त्याठिकाणी येण्याचे भाग्य लाभले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
माहिती संचालक डॉ. मुळे म्हणाले की, संस्थांनचे उपक्रम हे निश्चितपणे सामान्य माणसाला आत्मविश्वास देणारे आहेत.
यावेळी संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गाडीलकर यांनी संस्थान राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सेवा उपक्रमांच्या माध्यमातून भक्तांची आरोग्य, शिक्षणासाठी मदत, रोजगारनिर्मितीला चालना असे बहुपयोगी उपक्रम सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी सर्व सदस्यांचा श्री साईबाबा मूर्ती आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला.
***

















WhatsApp