मुंबई, दि. ९ : नांदेड जिल्ह्यातील भदंत टेकडी, हदगाव येथे उभारण्यात येणारे प्रस्तावित विपश्यना केंद्र हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे आध्यात्मिक, पर्यटन व अध्ययन केंद्र म्हणून विकसित झाले पाहिजे. या प्रकल्पातील तांत्रिक बाबींची तपासणी करून सुधारित प्रस्ताव तातडीने सादर करावा, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले.
मंत्रालयात भदंत टेकडी, हदगाव येथील विपश्यना केंद्र व अभ्यासिका उभारणीसंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी हदगावचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे तसेच नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाचे निवासी उपजिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
बैठकीत मंत्री शिरसाट म्हणाले की, भदंत टेकडी येथे असे भव्य आणि आकर्षक बांधकाम उभारण्यात यावे की राज्यभरातील नागरिकांनी या ठिकाणाला आवर्जून भेट द्यावी असे वाटले पाहिजे. प्रस्तावित विपश्यना केंद्र व अभ्यासिका हा प्रकल्प राज्यासाठी एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरावा. त्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबींचा सखोल अभ्यास करून सुधारित प्रस्ताव सादर करण्यात यावा, असे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. तसेच, विपश्यना केंद्राचे नियोजन करताना परिसराचे नैसर्गिक सौंदर्य, पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा यांचा समन्वय साधावा, जेणेकरून हे केंद्र राज्यातील एक आदर्श आणि प्रेरणादायी स्थळ म्हणून विकसित होईल, असेही मंत्री शिरसाट यांनी नमूद केले.
0000
मोहिनी राणे/स.सं






















WhatsApp