हायलाइट्स:
- राजू शेट्टी यांच्याकडून ममता बॅनर्जींचं अभिनंदन.
- भाजपविरोधी आघाडीचं नेतृत्व करण्याचीही केली मागणी.
- महाआघाडीत निर्माण झाला नवा संभ्रम?
‘जखमी वाघिणीच्या पंजाने चौकीदार झाला घायाळ. पश्चिम बंगालमधील निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल ममतादीदींचं अभिनंदन! त्यांनी आता देशातील भाजपविरोधी आघाडीचं नेत्तृत्व करावं,’ असं ट्वीट राजू शेट्टी यांनी केलं आहे.
भाजपविरोधी आघाडी
नरेंद्र मोदींचा राष्ट्रीय राजकारणात उदय झाल्यानंतर देशभरातील विविध निवडणुकांमध्ये भाजपची विजयी घोडदौड सुरू झाली. भाजपने अनेक राज्यांमध्ये आपला झेंडा फडकावत विरोधकांना हादरे दिले. भाजपचा हा विजयरथ रोखण्यासाठी इतर सर्व पक्षांनी एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही, असा सूर अनेकांकडून लावला जातो. मात्र अद्याप अशी मजबूत आघाडी उभा करण्यात विरोधकांना अपयश आलं आहे.
शरद पवार आणि शिवसेना
भाजपचा पराभव करण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांनी एकत्र यावं, अशी भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातत्याने मांडली आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनीही या आघाडीचं नेतृत्व शरद पवार यांच्याकडे द्यावं, अशी मागणी केली होती. मात्र महाविकास आघाडीत सामील असणाऱ्या राजू शेट्टी यांनी या भाजपविरोधी आघाडीचं नेतृत्व ममता बॅनर्जी यांनी करावं, अशी साद घातल्याने विरोधकांमध्ये नवा संभ्रम तयार झाला आहे.