भारत गौरव पर्यटन – महासंवाद

भारत गौरव पर्यटन – महासंवाद
- Advertisement -

भारत गौरव पर्यटन – महासंवाद

छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी इतिहासाअशी निगडीत महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक स्थळांना भेटी देवून शिवरायांचा जाज्ज्वल्य इतिहास अनुभवण्याची सुवर्णसंधी ‘भारत गौरव टुरीस्ट ट्रेन’च्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. पर्यटन आणि इतिहासाची आवड असणाऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. भारत गौरव टुरिस्ट ट्रेन या योजनेची ही माहिती.

भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (आयआरसीटीसी), ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा अनुभव देण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ या एका विशेष

ट्रेनची घोषणा केली आहे. ही यात्रा भारत गौरव टुरीस्ट ट्रेन (भारत गौरव टुरिस्ट ट्रेन) अंतर्गत ९ जून २०२५ पासून सुरू होत आहे. या ५ दिवसांच्या विशेष टूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट, इतिहासावर आधारीत कार्यक्रम असणार आहेत. या सहलीद्वारे महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व असलेल्या ठिकाणांचा पर्यटकांना अनुभव घेता येणार आहे.

भारत गौरव ट्रेनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तेजस्वी इतिहासाशी निगडीत धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना व्यापक प्रसिद्धी मिळवून देण्याचा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा मानस आहे. याबाबत पर्यटनमंत्री शंभूराज देसाई व राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या नेतृत्वाखाली पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे, व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सुर्यवंशी आणि पर्यटन संचालक बी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

ही केवळ एक यात्रा नसून, आपल्या वैभवशाली परंपरेचा, सांस्कृतिक वारशाचा आणि स्वाभिमानी इतिहासाचा साक्षात अनुभव घेण्याची सुवर्णसंधी आहे. भारतीय रेल्वे विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी ऐतिहासिक उपक्रमासाठी विविध अंगांनी सुसज्ज तयारी केली आहे. भारत गौरव ट्रेन ज्या-ज्या ठिकाणी पोहोचेल, त्या ठिकाणी असलेल्या पर्यटन स्थळांची सविस्तर माहिती पर्यटकांना देण्यात येणार आहे.

यात्रेदरम्यान, सर्व प्रवाशांचा अनुभव सुखकर आणि संस्मरणीय व्हावा, यासाठी महामंडळाचे अधिकारी आयआरसीटीसीच्या समन्वयाने प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करतील. ५ दिवसांच्या या प्रवासात रेल्वेस्थानकांपासून ते गडकिल्ल्यांपर्यंत, प्रत्येक ठिकाणी इतिहासाच्या पाऊलखुणांचा वेध घेत, पर्यटकांना समृद्ध अनुभव दिला जाईल.

प्रत्येक गडकोटावर, ऐतिहासिक स्थळी पर्यटन व्यवस्थेचे काटेकोर नियोजन केले जाईल. इतिहासावर आधारित कार्यक्रम, गाईड्स, तसेच स्थानिक शिवप्रेमी संघटनांच्या सहकार्याने ही यात्रा अधिक संस्मरणीय करण्यात येईल.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा तेजोमयी इतिहास, महाराष्ट्राची शौर्यशाली परंपरा, आणि आपली समृद्ध संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याच्या शासनाच्या ध्यासाला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ संपूर्ण समर्पणाने साथ देत आहे.

या उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या पर्यटनाला नवे क्षितिज गवसणार असून, प्रत्येक भारतीयाच्या हृदयात शिवप्रेमाची जाज्वल्य ज्वाला जागवली जाणार आहे. या प्रेरणादायी यात्रेत सहभागी होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वसा चालवावा, आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगावा, आणि नव्या पिढीला या इतिहासाचे दर्शन घडवावे, अशी अपेक्षा आहे.

सहल तपशील :

सहलीचे नाव : छत्रपती शिवाजी महाराज सर्किट शुभारंभ दि. ९ जून २०२५

कालावधी : ५ दिवस ६ दिवसांची यात्रा (सकाळी समाप्ती) प्रारंभ व समाप्ती स्थान : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), मुंबई प्रवास सुरु व संपण्याचे स्थानक : दादर, ठाणे यात्रेचा प्रवासमार्ग- मुंबई (सीएसएमटी) – रायगड – पुणे – शिवनेरी – भीमाशंकर – प्रतापगड – कोल्हापूर – पन्हाळा – मुंबई.

प्रमुख स्थळांची माहिती –

रायगड किल्ला – छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक येथे झाला व ही राजधानी होती. लाल महाल, पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण येथे गेले. कसबा गणपती व शिवसृष्टी, पुणे – पुण्याचे ग्रामदैवत व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील संग्रहालय.

शिवनेरी किल्ला – छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ. भीमाशंकर ज्योतिर्लिंग–१२ ज्योतिर्लिंग पैकी एक प्रमुख धार्मिक स्थळ.

प्रतापगड किल्ला–अफझल खानावरील ऐतिहासिक विजयाचे ठिकाण.

कोल्हापूर–महालक्ष्मी मंदिर पन्हाळा किल्ला – बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याचे प्रतीक. पॅकेज शुल्क (प्रति व्यक्ती) उपरोक्त सहलीसाठी विविध पॅकेजेस तयार करण्यात आली असुन सोयीनुसार इकोनॉमी (एसएल), कम्फर्ट (३ एसी), सुपीरियर (२ एसी) अशा प्रकारच्या सुविधांची निवड करता येणार आहे. या पॅकेजबाबत सविस्तर माहिती (आयआरसीटी) च्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

पॅकेजमध्ये समाविष्ट सेवा : भारत गौरव ट्रेनने प्रवास

(एसएल/३एसी/२एसी/एसी/नॉन-एसी) हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था सर्व ठिकाणी स्थानिक वाहतूक व गाईड ऑनबोर्ड व ऑफबोर्ड शुद्ध शाकाहारी भोजन प्रवास विमा, सर्व प्रवेश शुल्क (किल्ले, मंदिरे, रोपवे, शिवसृष्टी इत्यादी), सुरक्षा व्यवस्था.

पॅकेजमध्ये नसलेल्या सेवा: – साहसी खेळ, बोटिंग इत्यादी. खोलीतील सेवांसाठी वेगळी रक्कम आकारली जाईल. इतर कोणताही वैयक्तिक खर्च. कोणतेही अतिरिक्त पर्यटन स्थळ.

दैनंदिन टूर कार्यक्रम (संक्षिप्त):–

  •  पहिला दिवस: मुंबई – रायगड – पुणे.
  • दुसरा दिवस: पुणे (लाल महाल, शिवसृष्टी, कसबा गणपती).
  • तिसरा दिवस: शिवनेरी – भीमाशंकर – पुणे.
  • चौथा दिवस: प्रतापगड – कोल्हापूर. पाचवा दिवस: कोल्हापूर – महालक्ष्मी मंदिर – पन्हाळा किल्ला – मुंबई.
  • सहावा दिवस: मुंबई (टूर समाप्त).

आरक्षण व अधिक माहितीसाठी संपर्क: – भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (आयआरसीटीसी) वेबसाईट: www.irctctourism.com अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे उपयुक्त ठरेल.

00000

 

-अनिल आलुरकर

उपसंचालक (माहिती), अमरावती

- Advertisement -