औरंगाबाद : बांगलादेशी आणि पाकिस्तानी हटाव या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत मोर्चा काढला होता. या मोर्चानंतर मनसे कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी बांगलादेशी आणि पाकिस्तानी नागरिकांची शोधमोहीम सुरू केली आहे. मुंबईपाठोपाठ पुण्यातही मनसेच्या कार्यकर्त्यांनी ही मोहीम हाती घेतली होती. त्यानंतर आता बांगलादेशी घुसखोरांची माहिती द्या अन् 5 हजार मिळवा अशी ऑफरच मनसेने दिली आहे.
औरंगाबाद मनसेने घुसखोरांना पकडून दिल्यास पाच हजार रुपये बक्षीस म्हणून देऊ असं जाहीर केलं आहे. आकाशवाणी चौकात मनसेने एक स्टॉल उभारला आहे. या स्टॉलवर घुसखोरांची गुप्तपणे माहिती द्यायची. माहिती देणाऱ्यांचं नाव गुप्त ठेवण्यात येईल. मात्र, घुसखोरांची माहिती खरी ठरल्यानंतरच माहिती देणाऱ्या व्यक्तिला पाच हजार रुपये बक्षीस म्हणून दिले जाणार असल्याचं मनसेने स्पष्ट केलं आहे.

पाकिस्तान आणि बांगलादेशी घुसखोरांची पुराव्या सहित माहिती दया आणि रोख 5000 मिळवा अशा आशयाच्या बॅनरसह एक स्टॉल मनसेने औरंगाबादमध्ये लावला आहे. राज ठाकरे यांनी 23 जानेवारी रोजी झालेल्या मनसेच्या अधिवेशनात पाकिस्तान आणि बांगलादेशी घुसखोर यांना हकलून दया म्हणत आपली स्पष्ट भूमिका मांडली होती. औरंगाबाद शहरात देखील घुसखोर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक लोकांच्या घराशेजारी देखील असेच लोक राहत असतील म्हणून औरंगाबाद मनसेने ही योजना आखली आहे.
जे नागरिक अशा प्रकारच्या घुसखोरांची माहिती पुराव्यानिशी देतील त्यांना मनसेतर्फे रोख 5000 रुपये देण्यात येणार आहेत. ही सर्व योग्य माहिती लगेच पोलिसांकडे पोहचवण्यात येईल आणि शहानिशा झालेल्या घुसखोरांना हकलण्यात येईल. जे नागरिक पुरावे देतील त्यांची नावे गुप्त राखण्यात येईल यासाठी मनसे मध्यवर्ती कार्यालय आकाशवाणी चौक येथे स्टॉल उभारण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर शहरात आणखीन 5 ठिकाणी असे स्टॉल्स उभारण्यात येणार असल्याची माहिती मनसेच्या वतीने देण्यात आली आहे.






















WhatsApp