
मुंबई, दि. १७ : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या जयंतीनिमित्त दादर येथील चैत्यभूमी येथे आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीस सामजिक न्याय विभाग, मुंबई शहर जिल्हाधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई पोलीस, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मध्य व पश्चिम रेल्वे, एसटी महामंडळ आणि इतर संबंधित शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी, विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या महामानवाच्या जयंती सोहळ्यासाठी दरवर्षीप्रमाणे देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येत असतात. हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरणात पार पडण्यासाठी सर्व यंत्रणांनी आपापसांत योग्य समन्वय ठेवावा, अशा सूचना मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी यावेळी दिल्या.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने चैत्यभूमी परिसर, शिवाजी पार्क आणि परिसरात स्वच्छता, पिण्याचे पाणी, फिरते शौचालय आणि आरोग्य पथकांची चोख व्यवस्था करून नागरी सुविधा पुरविण्यात यावे. मुंबई पोलिसांनी गर्दीचे नियोजन आणि सुरक्षेच्या दृष्टीने बंदोबस्त तैनात करावा आणि सुरक्षा व्यवस्था पुरवावी. रेल्वे आणि एसटी महामंडळाने अनुयायांच्या प्रवासासाठी अतिरिक्त गाड्यांचे नियोजन करावे, जेणेकरून प्रवाशांची गैरसोय होणार नाही याचे नियोजन करून वाहतूक व्यवस्था करावी, एमएमआरडीए आणि संबंधित विभागांनी मैदानातील व्यवस्था, तात्पुरता निवारा आणि वीजपुरवठ्याची जबाबदारी वेळेत पूर्ण करावी. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने या सोहळ्याचे व्यापक प्रसिद्धी नियोजन करावे, असे मुख्य सचिवांनी सांगितले.
१४ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या या सोहळ्यात व्यापक लोकसहभाग असतो. दरवर्षी प्रमाणे प्रशासनाने कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत याची काळजी घ्यावी. शासकीय यंत्रणांनी सेवाभावी वृत्तीने काम करून अनुयायांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देशही मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिले.
०००
काशीबाई थोरात/विसंअ




















WhatsApp