Home बातम्या ऐतिहासिक महाविकास आघाडीची विकास पताका घेऊन धावली कोयना आणि महाराष्ट्र एक्सप्रेस

महाविकास आघाडीची विकास पताका घेऊन धावली कोयना आणि महाराष्ट्र एक्सप्रेस

0
महाविकास आघाडीची विकास पताका घेऊन धावली कोयना आणि महाराष्ट्र एक्सप्रेस

सातारा, दि. 12 (जिमाका) : राज्य शासनाने मागील दोन वर्षात राबविलेल्या विविध विकासकामे आणि योजनांची माहिती लांब पल्यांच्या  एक्सप्रेस रेल्वेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. यात सातारा जिल्ह्यातून कोयना एक्सप्रेस (कोल्हापूर ते मुंबई)  आणि महाराष्ट्र एक्सप्रेस (कोल्हापूर ते गोंदिया) धावणाऱ्या   एक्सप्रेसची निवड करण्यात आली असून, राज्य शासनाने मागील दोन वर्षात राबविलेली विकासकामे आणि योजनांची आकर्षक पद्धतीने माहितीसह या दोन्ही एक्सप्रेस प्रवास करत आहे.

राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना, कार्यक्रम यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठीच्या या उपक्रमास प्रतिसाद मिळत आहे. रेल्वेवरुन प्रसारित करण्यात आलेल्या विविध योजनांची प्रवासी, स्थानिक लोक माहिती घेत आहेत.

भाऊसाहेब राजे रेल्वे प्रवासी यांची प्रतिक्रिया

महाविकास आघाडी शासनाला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने शासनाने दोन वर्षात केलेल्या कामांची व विविध योजनांची माहिती रेल्वेच्या बोगींवर लावण्यात आली आहे. हा उपक्रम सुंदर असून यातून नागरिकांना शासनाने केलेल्या दोन वर्षातील सुधारणा, वारकरी संप्रदाय, शेतकऱ्यांची कर्ज माफी यासह अनेक केलेल्या कामांच्या माहितीबरोबर नागरिकांसाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती होत आहे.  

रेल्वेवर लावण्यात आलेल्या विविध जाहिराती अत्यंत आकर्षक व सुंदर आहेत. या जाहिरातींच्या माध्यमातून लावण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती घऊन नागरिकांनी   लाभ घ्यावा. महाविकास आघाडी शासनाने या पुढेही  असेच जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा रेल्वे प्रवासी  भाऊसाहेब राजे यांनी व्यक्त केली.

‘दोन वर्षे जनसेवेची महाविकास आघाडीची, ‘आपला महाराष्ट्र, आपले सरकार’ अंतर्गत राज्य शासनाने राबविलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. यात कौशल्य विकास-रोजगार मेळावा आणि वेबपोर्टलद्वारे दीड लाख बेरोजगारांना रोजगार, महिला सक्षमीकरणातंर्गत कुटूंबातील महिलांच्या नावावर घर असल्यास मुद्रांक शुल्कात एक टक्क्याची सूट, कोरोना महामारीत पालक गमावलेल्या बालकांच्या सुरक्षित भविष्यासाठी पाच लाखांची मुदत ठेव योजना, चिंतामुक्त शेतकरी, मोफत सातबारा आता दारी येणार, ई-पीक पाहणी नोंदणीही करता येणार, जिथे सारथी तिथे प्रगती-क्षमता आणि कौशल्य वृद्धीसाठी शिक्षण-प्रशिक्षण, पर्यावरणपूरक प्रवासाला राज्य शासनाचे प्राधान्य, विद्युत बस सेवेत वाढ राज्यातील प्रदूषणाला आळा आदी माहिती ‘महाराष्ट्र एक्सप्रेस’द्वारे जनतेपर्यंत पोहचविण्यात येत आहे.

राज्य शासनाची विकासकामे व योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचाविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या एक्सप्रेस रेल्वे सातारा जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांवर आल्यानंतर बोगींवर लावण्यात आलेल्या आकर्षक जाहिराती प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहेत.