Home ताज्या बातम्या महाविकास आघाडी कधीपर्यंत टिकणार? उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर

महाविकास आघाडी कधीपर्यंत टिकणार? उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर

0
महाविकास आघाडी कधीपर्यंत टिकणार? उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर

हायलाइट्स:

  • शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचं आक्रमक रूप
  • विरोधकांसह मित्रपक्षांनाही इशारा
  • दादरमधील राड्यावरून भाजपला टोला

मुंबई : शिवसेनेच्या वर्धापन दिनी शिवसैनिकांना ऑनलाईन माध्यमांतून संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी करोनासह राजकीय परस्थितीवरही भाष्य केलं आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका करत आगामी काळातील आपली राजकीय दिशा स्पष्ट केली. तसंच आघाडी सरकार किती काळापर्यंत टिकणार, या प्रश्नावरही आपलं मतं मांडलं आहे.

‘अनेकजण विचारतात आघाडी कधीपर्यंत टिकणार…बघत जाऊ ना पुढे, आमचा हेतू प्रामाणिक आहे, राज्याचा विकास करण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागल्या,’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीबाबत भाष्य केलं.

विरोधकांसह मित्रपक्षांनाही इशारा

उद्धव ठाकरे यांच्या आजच्या भाषणात त्यांनी भाजपवर जोरदार टीका केल्याने आगामी काळातही ते पुन्हा भाजपसोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ‘सत्तेसाठी आपण लाचार होणार नाही आणि विनाकारण कोणाच्या पालख्याही आम्ही वाहणार नाही. त्यासाठी आपला जन्म झालेला नाही. आम्ही स्वाभिमानी चालू, आपल्या पावलावर चालू,’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपसह महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनाही इशारा दिला.

दादरमधील राड्यावरून भाजपला टोला

राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना भवनावर मोर्चा काढणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना शिवसैनिक भिडले होते. काही दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेची राज्यभर मोठी चर्चा झाली. आता उद्धव ठाकरे यांनीही या घटनेवरून भाजपला टोला लगावला आहे. ‘शिवसेनेप्रमुखांचं एक वाक्य सध्या व्हायरल होत आहे. समोरच्याचा फटकन आवाज आला तर आपला काडकन आवाज आलाच पाहिजे…हे का व्हायरल होतं हे ज्याचं त्याला माहिती,’ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंचं आक्रमक भाषण, जाणून घ्या ठळक मुद्दे…

– मी मुख्यमंत्री म्हणून नाही तर शिवसेना कुटुंबाचा कुटुंबप्रमुख म्हणून आज संवाद साधत आहे. ५५ वर्ष ज्या शिवसैनिकांनी कष्ट घेऊन शिवसेना वाढवली त्यांना मी अभिवादन करतो.

– शिवसेनेचे पहिल्या फळीतील नेते आजही मला मार्गदर्शन करत आहेत.

– शिवसैनिकांच्या आयुष्यात तीन सण आहेत…एक शिवसेनाप्रमुखांचा जन्मदिन, दुसरा शिवसेनेचा वर्धापन दिन आणि तिसरा मार्मिकचा वर्धापन दिन

– आता अनेकजण स्वबळाचे नारे देत आहेत, पण स्वबळ म्हणजे फक्त निवडणुका लढवण्याबाबत नाही..स्वबळ म्हणजे अन्यायाविरुद्धची ताकद

– स्वबळाचा नारा हा आमचा हक्क आहे, पण स्वबळ म्हणजे फक्त निवडणुकांचं नाही, तर ती मानसिक ताकद आहे

– संकटाला घाबरलो तर शिवसेनाप्रमुख आणि माँ मला माफ करणार नाहीत

– शिवसेनेएवढं राष्ट्रावर, देशावर प्रेम करायला सांगणारा दुसरा पक्ष नाही

– संकट येतं तेव्हा शिवसेना पुढे सरसावते

Source link