महिला व मुलींच्या  सक्षमीकरणासाठी जिल्हा परिषद उत्पन्नाच्या निधीतून योजना राबविण्याचा ग्रामविकास विभागाचा निर्णय  – महासंवाद

महिला व मुलींच्या  सक्षमीकरणासाठी जिल्हा परिषद उत्पन्नाच्या निधीतून योजना राबविण्याचा ग्रामविकास विभागाचा निर्णय  – महासंवाद
- Advertisement -

मुंबई,दि. ३१: महिला व बाल विकासाशी संबंधित विविध कार्यक्रम राबविण्यासाठी सर्व जिल्हा परिषदांमध्ये महिला व बाल कल्याण समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. महिला व मुलींना सर्व क्षेत्रात सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषद क्षेत्रात महिला व बाल कल्याण समित्यांमार्फत जिल्हा परिषद उत्पन्नाच्या 10 टक्के निधीतून खालील योजना सक्षमपणे राबविण्याचा निर्णय घेतला असून याआधीचे  शासन निर्णय, पुरक पत्रे व शुध्दीपत्रके या द्वारे अधिक्रमित करून गट अ प्रशिक्षण व सक्षमीकरणाच्या योजना तसेच गट ब च्या योजना (वस्तु व खऱेदीच्या योजना ) राबवण्याचा निर्णय ग्रामविकास विभागमार्फत घेण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

गट अ प्रशिक्षण व सक्षमीकरणाच्या योजनेअंतर्गत मुलींना व महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण,मुलींना स्वसंरक्षणासाठी व त्यांच्या शारिरिक विकासासाठी प्रशिक्षण,महिलांसाठी समुपदेशन केंद्र,इयत्ता 7 वी ते 12 वी पास मुलींना संगणक प्रशिक्षण, तालुकास्तरावर शिकणा-या मुलींसाठी हॉस्टेल चालवणे, किशोरवयीन मुलींना व महिलांना जेंडर,आरोग्य,कुटुंबनियोजन,कायेदविषयक प्रशिक्षण, अंगणवाड्यांसाठी स्वतंत्र इमारत,भाडे, बालवाडी व अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका, आशा वर्कर्स आणि जिल्हा परिषदेअंतर्गत मानधन तत्वावर कार्यरत कर्मचारी यांना पुरस्कार देणे, पंचायत महिला शक्ती अभियान अंतर्गत पंचायत राज संस्थामधील लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण व महिला मेळावे व मार्गदर्शन केंद्र, बालवाडी व अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका यांचे प्रशिक्षण, विशेष प्राविण्य मिळवेलल्या मुलींचा सत्कार, महिला व बालकल्याण समिती सदस्यांचा दौरा या बाबींचा समावेश आहे.

तर गट ब च्या योजना (वस्तू खरेदीच्या योजना ) या मध्ये अंगणवाडींना विविध साहित्य पुरविणे, कुपोषित मुलामुलींसाठी व किशोरवयीन मुलींसाठी, गरोदर,स्तनदा माता यांना अतिरिक्त आहार,दुर्धर आजारी मुलांचे शस्त्रक्रियेसाठी अर्थसहाय्य, महिलांना विविध साहित्य पुरवणे, 5 वी ते 12 वी पर्यंतच्या शिकणा-या मुलींसाठी सायकल पुरवणे,या बाबींचा समावेश आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कारः

महिला व बाल विकास विभागाने प्रत्येक ग्रामपंचायत/गट ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित दिनांक 31 मे रोजी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. या शासन निर्णयामध्ये पुरस्काराचे स्वरूप, पात्रता निकष, पुरस्कारार्थी महिलेची निवड करण्याची कार्यपद्धती व यंत्रणा निश्चित करण्यात आले आहे. या पुरस्कारासाठी प्रति ग्रामपंचायत/गट ग्रामपंचायत अपेक्षित असलेला अंदाजे रूपये दोन हजार इतका खर्च महिला व मुलींना सर्व क्षेत्रात सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषद क्षेत्रात महिला व बाल कल्याण समित्यांना उपलब्ध होणा-या जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाच्या 10% निधीतून करण्यात  यावा, असे शासन निर्णयात नमूद केले आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

00000

- Advertisement -