Home शहरे बीड मांजरसुंबा घाटात स्कॉर्पिओ खोल दरीत कोसळली; तीन ठार, एक गंभीर

मांजरसुंबा घाटात स्कॉर्पिओ खोल दरीत कोसळली; तीन ठार, एक गंभीर

0

बीड : कपीलधारकडून मांजरसुंब्याच्या घाटमार्गाने बीडकडे येणाऱ्या स्कार्पिओ गाडीला भीषण अपघात झाला. गाडी खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात दोन जणांचा जागेवर तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एक गंभीर जखमी असून त्याच्यावर जिल्हा रुग्णायलयात उपचार सुरू आहेत.

मिळालेली माहिती अशी की, ही घटना शनिवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास घडली. हरीश कांबळे (वय 30), सचिन सुरवसे (वय 32), संतोष काळे, धम्मानंद वीर व (सर्व राहणार बीड) हे फिरण्यासाठी कपीलधार येथे जात होते. यावेळी मांजरसुंबामार्गे कपीलधारकडे जात असताना घाटातील वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने स्कार्पीओ (एमएच-14 एवाय-1485) दरीत कोसळली. या भीषण अपघातामध्ये हरीश कांबळे, सचिन सुरवसे यांचा जागीच मृत्यू झाला. संतोष काळेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. धम्मानंद वीर हा गंभीर जखमी असून त्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

विष प्राशन करुन विद्यार्थीनीची आत्महत्या

दुसऱ्या एका घटनेत महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणीने क्लासेस लावण्यासाठी पैसे नसल्याने विषप्राशन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सारिका दादासाहेब शिंदे (वय-18) असे मृत तरुणीचे नाव आहे. सारिकाने विषप्राशन केल्याचे समजताच तिला नातेवाईकांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करताना ट्राफिक पोलिसांनी गाडी अडवली. तसेच हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतरही तिथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने तिचा उपचाराचाअभावी मृत्यू झाल्याचा आरोप सारिकाच्या नातेवाईकांनी केला आहे. यामुळे प्रशासनांच्या हलगर्जीपणामुळे एका मुलीचा उपचाराअभावी जीव गेल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

गेवराई तालुक्यतील कोळगाव येथे ही घटना घडली. सारीका शिंदे ही चलकंबा येथील 12 ची विद्यार्थिनी होती. सारिकाला अहमदनगर येथील आर्मी कॉलेजमध्ये क्लास लावायचा होता. मात्र, घरची परिस्थिती हलाखीची असल्याने तिला क्लासचे पैसे भरता आले नाही. त्यामुळे ती नाराज होती. याच नैराश्येतून तिने शु्क्रवारी सकाळी राहत्या घरी सकाळी साडे नऊच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले. घरच्यांना हा प्रकार समजताच तिला गेवराई येथे उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, सारिकाची प्रकृती जास्त खालावल्याने तिला बीड जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. अॅम्बुलन्स न मिळाल्याने तिला खासगी गाडीने हॉस्पिटलमध्ये नेताना शहरातील साठे चौकातील ट्राफिक पोलिसांनी गाडी अडवून चौकशी सुरु केली. विनंती करुन देखील लवकर सोडले नाही. 10 मिनिटे तिथेच वाया गेले. पोलिसांनी गाडी लवकर सोडली असती तर सारिकाचा जीव वाचला असता, असे तिच्या वडिलांनी सांगितले. तसेच जिल्हा रुग्णालयात सारिकाला दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टर उपलब्ध न झाल्यामुळे सारिकाचा उपचाराअभावी मृत्यू झाला.

प्रशासनांच्या हलगर्जीपणामुळे माझी मुलगी मेली..

प्रशासनांच्या हलगर्जीपणामुळे माझी मुलगी मेली, असा गंभीर आरोप सारिकाच्या वडिलांनी केला आहे. या बाबतीत पोलीस प्रशासनाला विचारले असता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पोलीस कर्मचाऱ्याने गाडी अडवली, असे दिसून आल्यास त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोतदार यांनी दिली. दरम्यान, जिल्हा रुग्णांलयापील डॉक्टरांनी या प्रकरणी बोलण्यास नकार दिला आहे.