Home बातम्या राष्ट्रीय ‘मुंबई मॉडेल’चं दिल्लीत कौतुक; मुंबईकरांनी करोनाला कसं हरवलं?

‘मुंबई मॉडेल’चं दिल्लीत कौतुक; मुंबईकरांनी करोनाला कसं हरवलं?

0
‘मुंबई मॉडेल’चं दिल्लीत कौतुक; मुंबईकरांनी करोनाला कसं हरवलं?

ऑक्सिजनपुरवठ्याच्या बाबतीत मुंबई महापालिकेने चांगले काम केले आहे. त्यांच्याकडून बोध घेतला पाहिजे. आम्ही ऑक्सिजनचा बफर स्टॉक करण्यास सांगितले होते. कोट्यवधींची लोकसंख्या असलेल्या मुंबईत हे शक्य आहे तर त्याचे अनुकरण निश्चितपणे दिल्लीतही करणे शक्य आहे, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्या. धनंजय चंद्रचूड म्हणाले. मुंबई मॉडेलचे विश्लेषण करण्यात यावे आणि त्यावर मुंबईची चमू सादरीकरणही देऊ शकते, असंही ते म्हणाले आहेत. न्यायालयानं नोंदवलेल्या या निरीक्षणानंतर पुन्हा एकदा मुंबई मॉडेलची चर्चा होऊ लागली आहे. मुंबईनं करोनावर कसं नियंत्रण मिळवलं याचा घेतलेला आढावा.

रुग्णसंख्या नियंत्रणात

मुंबईत झापाट्यानं वर गेलेला करोनाचा संसर्ग गेल्या दहा दिवसांपासून पुन्हा नियंत्रणात येऊ लागला आहे. फेब्रुवारीत मुंबईत करोनाची दैनंदिन रुग्णसंख्या पाच ते सहा हजारांवर सापडत होते मात्र, गेल्या काहि दिवसांपासून ही रुग्णसंख्या दहा ते ११ हजारांवर गेली आहे. बुधवारी मुंबईत तीन हजार ८८२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. रुग्ण संख्येला पुन्हा उतार येऊ लागल्याने मुंबई पूर्वपदावर येऊ लागली आहे. मुंबई शहर व उपनगरातील रुग्ण दुपटीचा कालावधी एप्रिल अखेरीस ३० ते ३५ दिवस इतका होता. मात्र कठोर निर्बंधांनंतर रुग्ण संख्या घटू लागल्याने रुग्ण दुपटीचा कालावधी वेगाने वाढू लागला आहे. मुंबईचा रुग्ण दुपटीचा कालावधी १२३ दिवस इतका आहे. तर, मुंबईचा रिकव्हरी रेट ९० टक्के इतका झाला आहे.

करोना रोखण्यासाठी ही मात्रा सर्वांत प्रभावी

करोनाचा संसर्ग चाळी आणि झोपडपट्ट्यांपेक्षा इमारतींमध्ये वेगाने फैलावतो आहे. त्यामुळे राज्य सरकारने करोनाविषयक उपाययोजनांमध्ये नव्याने जाहीर केलेल्या निर्बंधांमध्ये इमारतींवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. नवीन निर्बंधांमध्ये एखाद्या सोसायटीत पाचपेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास ती इमारत ‘मिनी कण्टेन्मेंट’ झोन म्हणून जाहीर करण्यात येत आहे. तसा फलक सोसायटीच्या प्रवेशद्वारावर लावला जात असून बाहेरच्या नागरिकांना इमारतीत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. सोसायटीतील नागरिकांना अत्यावश्यक कामांसाठीच बाहेर पडता येत आहे. करोना रोखण्यासाठी ही मात्रा सर्वांत प्रभावी असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.

पोलिसांची नजर

मुंबईच्या करोना लढ्याला साथ मिळाली ती मुंबई पोलिसांची. प्रत्येक प्रतिबंधित क्षेत्राबाहेर पोलिस, बिटमार्शलना नजर ठेवणे बंधनकारक केले आहे. मोठ्या प्रमाणात रुग्ण असल्यास पोलिसांचा पहारा ठेवला जातो. अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू दिले नाही. पोलिस मित्र म्हणून नेमलेल्या नागरिकांचा वापर उपयुक्त ठरला आहे.

नागरिकांचा प्रतिसाद

पाच रुग्ण आढळले की संपूर्ण इमारत सील केली जाते. एखाद्या मजल्यावर एक रुग्ण सापडला तरी आजूबाजूच्या घरांतील सर्वांच्या चाचण्या केल्या जात आहेत. मजला सॅनिटायझ केला जातो. परिणामी संसर्ग वाढत नाही. घरात विलगीकरण केलेल्या रुग्णांसाठी वैद्यकीय पथकांची प्रत्यक्ष भेट किंवा दूरध्वनीवरून संवाद. असंख्य सोसायट्यांनी पालिकेला चांगले सहकार्य केले आहे. सोसायटी पदाधिकारी स्वतःहून नवीन रुग्णांची माहिती पालिकेला देत आहेत. बाहेरच्या लोकांना सोसायटीत येऊ देण्यास प्रतिबंध केला जात आहे.

निर्बंधांची अमलबजावणी

करोना रुग्णसंख्या वाढत गेल्यानंतर वेळीच पालिकेनं कठोर पावलं उचलत कठोर उपाययोजना लागू केल्या. तसंच मुंबईत रेल्वे, बस, टॅक्सी आणि रिक्षांमध्ये प्रवासी संख्येवर निर्बंध घालण्यात आले आहेत. संपूर्ण मुंबईत नागरिकांच्या वावरावर निर्बंध कठोर केले. नागरिकांचा एकमेकांशी संपर्क कमी करण्यात यश आल्याने संसर्गात मोठी वाढ झालेली नाही.

Source link