मुंबई, दि. १५ : मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखे कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत, अशी भावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते व लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, डॉ. नाडकर्णी यांनी मानसोपचाराला केवळ वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहिले नाही. त्यांनी त्याला सामाजिक परिस्थितीच्या अभ्यासाची जोड दिली. यातून त्यांनी मानसोपचाराबाबतचा समाजातला पूर्वग्रह दूर करण्यासाठी अनेकविध उपक्रम राबविले. सामाजिक प्रश्नांवर ते संवेदनशीलपणे संशोधन अभ्यास करत उपाय शोधण्यासाठी प्रयत्नशील राहिले. या सगळ्यात ते व्याख्यानांमधून आणि विविध व्यासपीठांवरून सातत्याने बोलत राहिले. त्यासाठी त्यांनी विपुल लेखन केले. लालित्यपूर्ण लेखनशैली हे त्यांचे वैशिष्ट्य राहिले. यामुळे मराठी साहित्यातही त्यांच्या वैविध्यपूर्ण पुस्तक आणि कविता संग्रहाची भर घातली गेली. डॉ नाडकर्णी आयपीएच, मुक्तांगण व अन्य सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ते सक्रियपणे कार्यरत राहिले. त्यांच्या निधनामुळे मार्गदर्शक या सर्व क्षेत्रांना जोडणारा दुवा निखळला आहे. त्यांचे निधन वैद्यकीय, सामाजिक आणि साहित्यिक दृष्ट्या मोठी हानी आहे. डॉ.नाडकर्णी यांच्या परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ईश्वराने त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद द्यावी अशी प्रार्थना करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते व लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
0000






















WhatsApp