ठाणे – अंबरानाथ, बदलापूर परिसराला काल संध्याकाळपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले असून, बलदलापूर पश्चिम परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक सखल भागात पाणी साचले आहे. बदलापूरमधील रमेशवाडी, हेंद्रेपाडा या नदीजवळ असलेल्या परिसरांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे रहिवाशांचे हाल होत आहेत.
शुक्रवारपासून मुंबईसह ठाणे जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळत आहे. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या परिसरात पावसाचा जोर कायम राहिल्याने अनेक सखल भागात पाणी साचलं. बदलापूर, अंबरनाथ रेल्वे रुळावर पाणी साचल्याने लोकल सेवा थांबविण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला होता. दरम्यान, बदलापूरहून सीएसएमटीकडे येणारी वाहतूक पहाटे सुरू झाली होती.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एनडीआरएफच्या टीमलाही अंबरनाथ, बदलापूर स्टेशनला पाचारण करण्यात आलं. तसेच स्टेशनवर अडकून राहिलेल्या प्रवाशांसाठी चहा, बिस्कीट अशा खाण्याची सोय मध्य रेल्वेकडून करण्यात आली.