
अमरावती, दि. ९ (जिमाका) : मेळघाट संघर्ष यात्रेच्या निमित्ताने मेळघाटातील आरोग्य, पाणी पुरवठा आणि इतर समस्या प्रामुख्याने समोर आल्या आहे. शासन स्तरावरून या समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. या सर्व उपाययोजना तातडीने अंमलात आणण्यात याव्यात, यासाठी येत्या आठवड्यात बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन मंत्री उदय सामंत आणि प्रकाश आबिटकर यांनी दिले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरून आंदोलकांशी संवाद साधला.
बच्चू कडू यांच्या नेतृत्वात कर्जमुक्ती आठवण व मेळघाट संघर्ष यात्रेचा समारोप आज चिखलदरा येथे करण्यात आला. या यात्रेच्या निमित्ताने उद्योग मंत्री उदय सामंत आणि आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी भेट देऊन समस्या जाणून घेतल्या. यावेळी आनंदराव अडसूळ, उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरून आंदोलकांशी संवाद साधला. मेळघाटमधील प्रश्नांची जाण असून येत्या काळात विशेष बैठक बोलविण्यात येईल. यामध्ये आरोग्य, पाणीपुरवठा, सिडको, स्कायवॉक आदी सर्व प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात येईल. यात धोरणात्मक अडचण निर्माण झाल्यास मुख्यमंत्र्यांकडेही दाद मागण्यात येईल. सध्या शेतकऱ्यांचे सरकार असून शेतकऱ्यांना न्याय मागण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही. सरकारकडून सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
मंत्री श्री. सामंत यांनी राज्य शासनाने दोन लाख रुपयांची केलेली कर्जमुक्ती ही बच्चू कडू यांच्या आंदोलनामुळे झाली आहे. कर्जमुक्तीचा निर्णय आंदोलनामुळे झाला आहे. या कर्जमुक्तीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठपुरावा करून 30 जूनपर्यंत अहवाल घेतला आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केल्याने कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. पदयात्रेच्या निमित्ताने आदिवासींचे विविध प्रश्न समोर आले आहे. या सर्व प्रश्नांची दखल शासनाने घेतली असून यानंतर याबाबीसाठी पुन्हा आंदोलन करावे लागणार नाही. शासनाच्या योजना राबवताना त्रुटी आढळल्यास यात लक्ष घालून त्याची पूर्तता येत्या काळात करण्यात येईल.

श्री. आबिटकर यांनी चुरणी येथील उपजिल्हा रुग्णालय आणि 30 खाटांवरून 50 खाटांचे रुग्णालय करण्यासंदर्भात बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. त्यासोबतच या ठिकाणी सेवा देणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगल्या दर्जाच्या सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी स्वतंत्र बजेट देण्यात येईल. राज्य शासनाने सिकलसेलमुक्त अभियान हाती घेतले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने तपासणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. आंदोलनाच्या निमित्ताने मेळघाटातील विविध समस्या समोर आल्या आहेत. या समस्यांवर योग्य उपाययोजना करून कार्यवाही करण्यात येईल.
यावेळी बच्चू कडू यांनी चिखलदरा आणि मेळघाट परिसरातील विविध समस्यांची माहिती माहिती दिली.
0000000















WhatsApp