हायलाइट्स:
- पंतप्रधान मोदी व उद्धव ठाकरेंमध्ये स्वतंत्र चर्चा
- राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण
- स्वतंत्र भेटीवरून मनसेचा शिवसेनेला टोला
तब्बल २५ वर्षे असलेली शिवसेना-भाजपची युती २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी तुटली. राज्यातील सत्तावाटपाच्या मुद्द्यावरून ही युती तुटली होती. राज्यातील सत्तेचे समसमान वाटप हा दोन्ही पक्षांतील कळीचा मुद्दा होता. समसमान सत्तावाटपास भाजप राजी होता. मात्र, मुख्यमंत्रिपद अडीच वर्षे शिवसेनेला देण्यास भाजपचा विरोध होता. तर, भाजपनं लोकसभा निवडणुकीच्या आधी तसा शब्द दिला होता, असं शिवसेनेचं म्हणणं होतं. दोन्ही पक्ष आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अखेर युती तुटली. त्यानंतर राज्यात मोठी उलथापालथ होऊन महाविकास आघाडीचे सरकार आले. शिवसेनेनं काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसशी संधान साधून भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. त्यामुळं दोन्ही पक्षांत प्रचंड कटुता आली आहे. गेल्या दीड वर्षांपासून राज्यातील जनता त्याचा अनुभव घेत आहे.
वाचा: तेव्हाच सर्वांसाठी लोकल ट्रेन सुरू होईल; आदित्य ठाकरेंनी दिली माहिती
या सगळ्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पंतप्रधान मोदी व उद्धव ठाकरे यांच्यात स्वतंत्र चर्चा झाली. या बैठकीत नेमके काय झाले असेल याबाबत चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये या भेटीमुळं अस्वस्थता आहे. शिवसेना-भाजप पुन्हा जवळ येईल का, अशीही चर्चा सुरू झाली आहे. मनसेनं मात्र यानिमित्तानं शिवसेनेवर टीकेची संधी साधली आहे.
मनसेचे नेचे संदीप देशपांडे यांनी या संदर्भात एक ट्वीट केलं आहे. ‘आजच्या वैयक्तिक आणि बंद खोलीतल्या बैठकीत पंतप्रधानपद अडीच अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना? झाला असेल तर आत्ताच सांगा. नंतर कटकट नको,’ असा चिमटा देशपांडे यांनी काढला आहे.
वाचा: मोदी- उद्धव यांची स्वतंत्र बैठक; काँग्रेस, राष्ट्रवादीत अस्वस्थता