हायलाइट्स:
- डेल्टा प्लस व्हेरिएंटचे महाराष्ट्रात २१ रुग्ण
- राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचा पहिला मृत्यू
- लागण नेमकी कशी झाली?
राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. सध्या या २१ रुग्णांची माहिती आरोग्य विभागाकडून घेतली जात असतानाच या रुग्णांचे लसीकरण पूर्ण न झाल्याचं समोर आलं आहे. तसंच, यातील ३ रुग्णांचं वय १८ वर्षाखालील असल्यानं ते लसीकरणासाठी पात्र नाहीयेत. डेल्टा प्लसचे रुग्ण आढळलेल्या जिल्ह्यातील लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणात राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
वाचाः‘ईडीच्या अन्यायाशी शेवटपर्यंत लढेन म्हणणारे सरनाईक हतबल का झाले?’
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अलर्ट
राष्ट्रीय आरोग्य विभागाचे आयुक्त एन रामास्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या पाच जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत त्या राज्यात लसीकरण मोहिम मोठ्याप्रमाणात सुरु करण्यात येणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढत होती. त्यातील काही रुग्णांना डेल्टा प्लसची लागण झाली होती.
करोना विषाणूच्या डेल्टा प्लस व्हेरिएंट या विषाणूची लागण झालेल्या रुग्णाचा राज्यात पहिला मृत्यू झाला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे मृत्यू झालेली व्यक्ती ८० वर्षांची होती. या व्यक्तीला इतरही काही आजार होते अशी माहिती मिळत आहे.
डेल्टा प्लस व्हेरिएंट काय आहे?
डेल्टा प्लस व्हेरिएंट हे करोना विषाणूचे बदललेले रूप आहे. हे रुप राज्यात करोनाच्या तिसऱ्या लाटेचे कारण बनण्याची शक्यता व्यक्त होत आहे. भारतात करोनाची दुसरी लाट निर्माण होण्याचे डेल्टा प्लस व्हेरिएंट हेच कारण होते. हा डेल्टा सर्वप्रथम भारतात आढळला होता. हा डेल्टा B1.617.2 हे म्यूटेशन आहे.
वाचाः ठाणे पुन्हा तिसऱ्या गटात; काय सुरू, काय बंद?
लसीकरण हाच पर्याय
करोना विषाणूचा डेल्टा हा उत्परिवर्तित प्रकार अत्यंत संसर्गजन्य असून तो आतापर्यंत ८५ देशांमध्ये आढळला आहे आणि लसीकरण न झालेल्यांमध्ये त्याचा वेगाने प्रसार होत आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) महासंचालक टेद्रोस अदहानम गेब्रेयेसस यांनी दिला आहे. या विषाणूचा संसर्ग आणि त्यातून होणारे मृत्यू रोखण्याचा लसीकरण हा एकमेव परिणामकारक मार्ग आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसंच, लसीकरण न झालेल्यांमध्ये विषाणू वेगाने पसरत आहे. संसर्ग आणि त्यातून होणारे मृत्यू रोखण्याचा लसीकरण हा एकमेव परिणामकारक मार्ग आहे, असे त्या म्हणाल्या.
वाचाः सीएसएमटी, फोर्टमधील पाणीटंचाई दूर होणार